नाशिक : अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पेढीअंतर्गत प्रयोगशाळा नसल्यास अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे़ शासनाच्या या निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी राज्यस्तरावर खाद्यतेल व्यापारी असोसिएशनची स्थापना करण्याचा ठराव आज झालेल्या व्यापारी महासंघाच्या बैठकीत करण्यात आला़गंजमाळ चौक येथे शासनाकडून होणाऱ्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका व्यापारी महासंघाच्या वतीने तेल व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ राज्यस्तरावर असोसिएशनची स्थापना करण्याबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात यावी, अन्नसुरक्षा व मानके कायद्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी झाल्याशिवाय ती महाराष्ट्र राज्यातही केली जाऊ नये, असा ठराव यावेळी करण्यात आला़ अन्न व औषध प्रशासनाने तेल व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यास या कारवाईला जशास तसे उत्तर देण्याची तयारी करण्यात आल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी नमूद केले़ यासाठी सर्व तेल व्यापाऱ्यांनी कायमस्वरूपी एकजूट ठेवून या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीच्या वेळी तेल व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा कायदा, त्याची अंमलबजावणी व प्रत्यक्ष पॅकिंग करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या़ वास्तविक अन्न व औषध प्रशासनाकडेच पायाभूत सुविधा व मनुष्यबळ नसल्याने त्यांना कायदा राबविताना अडचणी येत आहेत़ परंतु याही परिस्थितीत व्यापाऱ्यांची मात्र अडवणूक केली जात आहे़ प्रत्येक व्यापाऱ्यांना पेढीअंतर्गत लॅब उभी करणे अवघड असल्याने उलट दहा व्यापाऱ्यांमध्ये मिळून शासनानेच लॅब देण्याची मागणी काही व्यापाऱ्यांनी केली़ बैठकीस महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजन दलवाणी, उपाध्यक्ष प्रफु ल्ल संचेती, भिवंडी येथील खाद्यतेल असोसिएशनचे तरुण जैन, मुंबईचे तेल व्यापारी शंकर ठक्कर, संगमनेर येथील ओमकार भंडारी, रामपूरचे अतुल न्याती आदि व्यासपीठावर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
शासन कारवाईविरोधात खाद्यतेल व्यापाऱ्यांची एकजूट
By admin | Updated: July 14, 2014 00:28 IST