सिन्नर : तालुक्यातल्या भोजापूर धरणातून करण्यात येणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबविण्याच्या मागणीसाठी सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवार (दि. २३) पासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. भोजापूर धरणातून चापडगाव, धुळवड, दापूर, गोंदे, कासारवाडी, चास व खंबाळे येथील शेतकरी बेकायदेशीररित्या पाइपलाइन टाकून पाण्याचा उपसा करीत असल्याची तक्रार सोनेवाडीच्या सरपंच सौ. प्रमिला लहानू सहाणे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार व पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर बेकायदेशीर पाणी उपशामुळे सोनेवाडी येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने म्हटले आहे. भोजापूर धरणासाठी सोनेवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे धरणातील पाणी सोनेवाडीकरांना पिण्यासाठी व शेतीला मिळणे गरजेचे व हक्काचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तथापि, धरणातून पाइपलाइनद्वारे बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. धरणामध्ये मत्स्यधन विकास सहकार संस्थेमार्फत मत्स्यबीज वाढविणे व विकसीत केले जाते. त्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यावर गावातील १०० ते १५० कुटुंबाचा उदर निर्वाह अवलंबून आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिण्याच्या पाण्याचा मनेगावसह सोळा गावे व कणकोरीसह पाच गाव या पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे या धरणातून होणार पाण्याचा बेकायदेशीर उपसा बंद करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सोमवार दि. २३ पासून सोनेवाडी येथे उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. (वार्ताहर)
भोजापूर धरणातून पाणी उपशाची तक्रार
By admin | Updated: June 20, 2014 22:30 IST