सुरगाणा : तालुक्यातील अलंगुण येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह त्रिपुरा राज्याचे ग्रामविकास, वनविभाग व उद्योगमंत्री जितेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो वर्हाडींच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आलेले पहावयास मिळाले. माजी आमदार जे.पी. गावित, कुसुम गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण, माकपाचे नेते अशोक ढवळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादीचे चिंतामण गावित तसेच श्रीधर देशपांडे, राजू पाटील, गुणाजी गावित, किसन गुजर, निंबा पगार, कळवणचे हिराजी चौधरी, शांताराम जाधव, हेमंत पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी चौधरी म्हणाले की, असा सामुदायिक विवाहसोहळा मी प्रथमच पहात. असे विवाह देशात सर्वत्र व्हायला हवेत. गरीब परिवाराला विवाहाचा खर्च परवडत नाही. हुंड्यासारखी व्यवस्था न परवडणारी आहे. आजचा हा सोहळा अभूतपूर्व असून, त्यासाठी मी गावित यांना धन्यवाद देतो. यावेळी गावित म्हणाले की, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी १९८१ साली येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात येऊन वधू-वरांना आशीर्वाद दिला होता. सुरुवातीच्या काळात केवळ २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सर्वप्रथम राक्षभुवन येथे पार पडले होते. हळूहळू जोडप्यांची संख्या वाढत गेली. आतापर्यंत १८ ते १९ हजार जोडप्यांचे विवाह सामुदायिकरीत्या संपन्न झाले. घरातील मुलांचे व मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातच पार पडल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात जे.पी. गावित यांचे पुत्र सुरगाणा पं.स.चे उपसभापती इंद्रजित गावित यांचा विवाह आंबेपाडा येथील ज्योती हिचेशी संपन्न झाला. या सर्व जोडप्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संसारपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अलंगुण येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह
By admin | Updated: June 1, 2014 00:55 IST