नाशिक : उत्तर प्रदेशात विधानसभा तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोळ घातला आणि त्यातून भाजपाने विजय मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे. या घोळाचा निषेध म्हणून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रतीकात्मक यंत्रांचे दहन करण्यात आले.उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात भाजपाला यश मिळाले असून, ते संशयास्पद असल्याचा आरोप आहे. या यंत्रात भारतीय जनता पार्टी निवडून येईल, अशा पद्धतीचा प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रारींकडे निवडणूक आयोगही डोळेझाक करीत आहे. तसेच गेल्याच महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही असाच प्रकार घडला असल्याचा आरोप बसपाचे प्रदेश महासचिव शांताराम तायडे, नाशिक विभागाचे समन्वयक अरुण काळे यांनी केला आहे. तसेच मतदान यंत्राचा निषेध म्हणून प्रतीकात्मक मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेश सचिव डॉ. संतोष अहिरे, जिल्हाध्यक्ष असिफभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग शिंदे, शहराध्यक्ष लालचंद शिरसाठ तसेच नितीन चंद्रमोरे, अविनाश उघाडे, राहुल डावरे, देवीदास तेजाळे, विजय शिंदे, सुजित साळवे आदि उपस्थित होते.
बसपाकडून प्रतीकात्मक मतदान यंत्रांचे दहन
By admin | Updated: March 12, 2017 20:45 IST