नाशिक : जिल्ह्याचे किमान तपमान झपाट्याने घसरत असून, नागरिक सध्या कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. शुक्रवारी निफाड येथे ५ अंश, तर नाशिकला ५.४ अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली. चालू मोसमातील हा नीचांक असून, आज सलग चौथ्या दिवशी नाशिक राज्यात थंड राहिले.उत्तर भारतात आलेल्या शीतलाटेमुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा पारा सातत्याने घसरत आहे. काल निफाडला ५.६, तर नाशिकला ६.४ अंश सेल्सिअस इतके तपमान होते. त्यात आज आणखी घसरण झाली. यामुळे सकाळपासूनच घराबाहेर पडताच अक्षरश: हुडहुडी भरत होती. दिवसभरही वातावरणात गारठा कायम होता. आज नाताळची सुटी असल्याने तशीही रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. त्यातच थंडीची भर पडल्याने सायंकाळीच रस्ते ओस पडले होते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी नाशिकमध्ये सन २०१४ मध्ये ६.१, २०१३ मध्ये ४.४, तर २०१२ मध्ये विक्रमी २.७ अशा किमान तपमानाची नोंद झाली होती. नाशिकखालोखाल राज्यात पुणे, गोंदिया (७.६), मालेगाव (८), नागपूर (८.१), महाबळेश्वर (१०.९) असे किमान तपमान नोंदवण्यात आले.
जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम
By admin | Updated: December 26, 2015 00:15 IST