नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील पक्षांच्या कामगिरीनुसार विधानसभा निवडणुकीचे जागावाटप व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले़ येथील कालिदास कलामंदिरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़तटकरे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी उमेदवार उभे केले असतानाही अधिक खासदार निवडून आले़ त्या तुलनेत काँग्रेसला यश मिळू शकले नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना या यशाचा विचार होणे गरजेचे आहे़ अधिक जागांसाठी आमचा आग्रह राहील असेही तटकरे म्हणाले़ गुजरातच्या विकासाबाबत बरीच चर्चा होत असली तरी नाशिकच्या विकासाचे रोलमॉडेलही चांगले असून त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे़ भाजपाचे राज्यस्तरीय नेते जनतेची दिशाभूल करीत आहेत़ कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले़राज्यात गेल्या पंचवीस वर्षांतील भीषण अशी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ कृषिसंजीवनी, पाणीपुरवठा अशा विविध योजना राबवून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार हे शेतकरी, तसेच राज्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले़ लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा विचार न करता नव्या उमेदीने विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे़ राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याचे सांगून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत असल्याचे पवार म्हणाले़केंद्रातील सरकार हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून, उद्योगपतीधार्जिणे आहेत़ वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्याचा सल्ला, गॅसअभावी दाभोळचा प्रकल्प बंद पडला आहे़ राज्य सरकारने तयार केलेल्या विकासाच्या योजनांबाबत केंद्र सरकार आकसबुद्धीने पाहत असून, या सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामास सुरुवात केली पाहिजे़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती वा जागावाटपांबाबत ज्येष्ठ नेते निर्णय घेतील़ मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार, भूमिका व काम जनतेपर्यंत पोहोचून राज्यात पुन्हा आघाडी सरकारची सत्ता आणण्याचे आवाहनही पवार यांनी केले़सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, भाजपाच्या पाठीशी असलेल्या उद्योगपतींना ‘अच्छे दिन’ आले, तर शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़ कांदा निर्यातबंदी, युरियाची भाववाढ, मुंबई-पुणे रेल्वेचे काम बंद झाले, तर कुंभमेळ्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही़ नवीन निवडून गेलेल्या खासदारांनी याबाबत लोकसभेत प्रश्न मांडले नाहीत़ येत्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीचाच झेंडा विधानभवनावर असेल, असा आशावादही भुजबळ यांनी व्यक्त केला़यावेळी आमदार हेमंत टकले, कविता कर्डक, शोभा मगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केलेल्या कामांची माहिती दिली़ यावेळी व्यासपीठावर श्रीराम शेटे, देवीदास पिंगळे, उमेश पाटील, ए़ टी़ पवार, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, सुनील बागुल, नीलेश राऊ त, अर्जुन टिळे, नाना महाले, दिलीप बनकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते़(प्रतिनिधी)