घोटी : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या युवकांनी आई कळसूबाई व शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून मानाची सलग १९ व्या वर्षी गुढी उभारली .कळसूबाई हे १६४६ मीटर उंचीचे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाते. या शिखरावर घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या युवकांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी थेट गडावर जाऊन गुढी उभारली. यावेळी उपस्थित युवकांनी आई कळसूबाईच्या मंदिराची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. गडावर असणाऱ्या विहिरीच्या पाण्याचा इतर गिर्यारोहकांना वापर करता यावा यासाठी विहिरीत असणारा गाळ बाहेर काढून पाणी पिण्यायोग्य केले. तसेच कळसूबाई माता व शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. मंदिराच्या ठिकाणी सर्व युवकांच्या साक्षीने गुढी उभारण्यात आली. अशा पद्धतीचा कार्यक्रम हा हे गिर्यारोहक अनेक वर्षापासून राबवित असल्याची माहिती कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी दिली.या नवीन वर्षी महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, बाळु आरोटे, प्रशांत जाधव, उमेश दिवाकर, संतोष म्हसने, ज्ञानेश्वर मांडे, प्रवीण भटाटे, पंढरीनाथ भटाटे, किसन दराणे, आदिनाथ भगत, गोरख डगळे व इतर सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
कळसूबाई शिखर परिसराची स्वच्छता
By admin | Updated: March 30, 2017 22:47 IST