नाशिक : पोलीसपाटील भरतीत गुणवत्ता असतानाही डावलल्या गेलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याचे घोंगडे जिल्हाधिकाऱ्यांवर झटकून मोकळे झालेल्या प्रांत अधिकाऱ्यांच्या अहवालावर महिना उलटूनही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनास वेळ मिळालेला नाही, परिणामी आज ना उद्या न्याय मिळेल या आशेवर असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. एप्रिल महिन्यात लेखी व मे महिन्यात तोंडी मुलाखती घेण्यात आलेल्या पोलीसपाटील भरतीचे कवित्व तीन महिन्यानंतरही सुरूच असून, या भरतीत सिन्नर व निफाड तालुक्यात झालेल्या गैरप्रकारामुळे ही भरती थेट मुंबई उच्च न्यायालय व मॅटमध्ये गाजली. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून तोंडी परीक्षेत प्रांत अधिकाऱ्याने आपल्या मर्जीने गुणदान करून पात्रांना अपात्र ठरविले, तर अपात्र पात्र ठरविल्याने मोठा गदारोळ झाला होता. या भरतीबाबत सिन्नर तहसील कार्यालयातील एक कर्मचारी उमेदवारांकडे सरळ सरळ पैशांची मागणी करीत असल्याची आॅडिओ क्लिपही व्हायरल झाल्यामुळे तर अन्यायग्रस्त उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना नुसती पुष्टीच मिळाली नाही, तर जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी अगोदर घेतलेली आक्रमक भूमिका गळून पडल्यामुळे साऱ्या प्रकरणात तथ्य असल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती. आदेश झुगारणाऱ्या प्रांत अधिकाऱ्याबाबत हतबलता व्यक्त करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारणाबाबत उमेदवारांच्या फेर मौखिक मुलाखती घेण्याची सूचनाही प्रांत अधिकाऱ्याने मान्य केली नाही, उलट पक्षी जिल्हाधिकाऱ्यांनीच या उमेदवारांच्या मुलाखती घ्याव्यात, अशी सूचना गेल्या महिन्यात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी तरी न्याय देतील, अशा आशेवर असलेल्या अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, परंतु महिना उलटला पण जिल्हाधिकाऱ्यांनाही त्याकडे बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. दोन दिवसांपूर्वीच काही उमेदवारांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली असता अजून वेळ आहे, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
उमेदवारांना फेर मुलाखतीची प्रतीक्षाच
By admin | Updated: August 17, 2016 00:21 IST