येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांसह, पाणीवापर संस्थेची शासनाने चेष्टा थांबवून पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी बळीराज्य पाणीवापर सहकारी संस्थेचे पदाधिकारी व शिष्टमंडळ व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत केवळ आश्वासना व्यतिरिक्त शिष्टमंडळाच्या हाती काही लागले नसल्याची माहिती शिष्टमंडळाचे प्रमुख शेतकरी नेते संतू पाटील झांबरे यांनी दिली. येवला येथून मंगळवारी सकाळी जलसंपदामंत्री महाजन यांचे स्वीय सहायक देशपांडे, जलसंपदा सचिव उपासे, उपसचिव बेलसरे यांची भेट घेऊन येवला तालुक्याच्या पाणी मागणी संबंधी निवेदन दिले. दरम्यान, कॅबिनेटची बैठक आटोपल्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी १६ सदस्यीय शिष्टमंडळाशी चर्चा झाली. शिष्टमंडळात संतू पाटील झांबरे, सुरेश कदम, प्रभाकर बोरनारे, भाऊसाहेब धुमाळ, बापू धारक, बाजीराव सोनवणे, सुभाष सोनवणे, ज्ञानेश्वर मढवई, सुभाष गायकवाड, श्यामराव मढवई, जनार्दन दिवटे, भाऊसाहेब कांबरे, महेश मढवई,अण्णा जाधव यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या बैठकीत महाजन यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सोडून शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन करावे,पाणीवापर संघाच्या शिष्टमंडळासह पाटबंधारे खात्याचे जबाबदार अधिकारी बोलवून पाणी कसे आणि किती उपलब्ध होईल याबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले. बळीराज्य पाणीवापर संस्थेचे चेअरमन संतू पाटील झांबरे यांनी चर्चेत पाणी नियोजनासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक व्हावी व त्यानुसार शेतकऱ्यांनी नेमके कोणते पीक घ्यावे हे नियोजन करता येते.परंतु कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभाग यांनी कोणत्याही प्रकारची कालवा सल्लागार समितीची बैठक नियोजित वेळेत घेतली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, अशी तक्रार जलसंपदा मंत्र्याकडे केली. यावर जलसंपदामंत्री महाजन यांनी आश्वासनाची बोळवण करून शिष्टमंडळाला माघारी पाठवले.
येवलेकरांची आश्वासनावर बोळवण
By admin | Updated: December 1, 2015 23:25 IST