पंचवटी : परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या नागरी वसाहतींतील रस्त्यांवर खडी, वाळू तसेच बांधकामाचे अन्य साहित्य रस्त्यावर पडून असले तरी मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे. जुना आडगाव नाक्यावरील चॉँदशावली बाबा दर्ग्याच्या मागे एका टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू असून, संबंधित बिल्डरने चक्क रस्त्यातच खडी व रेती टाकून रस्ता बंद केल्याने रस्ता मनपाचा की, बिल्डरचा असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यातच ज्या रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकले आहे ती जागा बिल्डरच्या मालकीची की, मनपाची हे स्पष्ट नसले तरी जागा मनपाची असेल तर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याने कारवाई का नाही आणि जागा जर खासगी मालकीची असेल तर त्या ठिकाणी मनपाने पेव्हर ब्लॉक कशाच्या आधारावर बसविले हे प्रश्नचिन्ह आहे. सध्या बांधकाम साहित्यामुळे रस्ता बंद झाल्याची ओरड नागरिकांकडून केली जात असली तरी प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनीही मौन बाळगल्याने नागरिकांना संताप व्यक्तकरावा लागत आहे. अशीच परिस्थिती हिरावाडी परिसरात असून, गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांनी तर थेट नागरी वसाहतीतील रस्त्यावर वाळू, खडी टाकून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केला आहे. (वार्ताहर)