नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून पॅनलनुसार ५१ सचिवांच्या नियुक्त्या केलेल्या असताना आणि यासंदर्भात दाखल याचिकेवरून उच्च न्यायालयाने या नियुक्त्यांना संरक्षण दिलेले असताना, राज्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी परस्पर सचिव बदलून न्यायालयाचा अवमान केल्याचे घोटी बाजार समितीचे माजी सचिव व याचिकाकर्ते जितेंद्र सांगळे यांचे म्हणणे आहे. कृषी पणन मंडळांकडून केलेल्या नेमणुकांबाबत २० आॅक्टोबर २०१३ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त सचिवांना संरक्षण दिलेले आहे. असे असताना राज्यातील बीड, सेलू, घोटी व राजुरा या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी परस्पर सचिव बदलण्याची कार्यवाही केल्याचा आरोप सांगळे यांचा आहे. राजुरा बाजार समिती सचिवांनी नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली असता सचिवांना कार्यमुक्त करण्याच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. याबाबत पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ४ मार्च २०१४ रोजीच बाजार समित्यांना वस्तुस्थिती कळवून उचित कार्यवाही करावी, असे कळविले होते. मात्र, बाजार समिती आणि पणन मंडळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करीत असून, या चारही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे जितेंद्र सांगळे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
पणन मंडळाने सचिव सोडले वाऱ्यावर
By admin | Updated: June 21, 2014 01:18 IST