नाशिक : उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने राज्यातील सर्वच मतदारसंघांतून सर्वेक्षण केले असून, त्यानुसारच उमेदवारीचे तिकीटवाटप होणार असल्याची माहिती निरीक्षक नेमलेल्या आमदार चंद्रकांत पाटील व आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.बळी मंदिरानजीक असलेल्या शुभमंगल कार्यालयात भाजपाच्या जिल्ह्यातील ११ व शहरातील ४ विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची व इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी निरीक्षक पाटील व मिसाळ आले होते. सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच इच्छुकांच्याही मुलाखती घेण्यात आल्या. ‘चाणक्य’मार्फत करण्यात आलेले लोकसभेचे सर्वेक्षण शंभर टक्के खरे ठरले होते. विधानसभेसाठी भाजपानेही याच खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण पूर्ण केले असून, सर्वेक्षणाचा अहवाल व आम्ही निरीक्षकांनी दिलेला अहवाल पडताळून त्यावर प्रदेश स्तरावरील कोअर कमिटीचे नेते चर्चा करून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली येणार असून, त्यांच्या चाळणीतून जे उमेदवार निश्चित होतील, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. भाजपाने मागील वेळेच्या ११९ जागांमध्ये आणखी २० जागांची मागणी केली आहे. तसेच घटक पक्षांना सेना-भाजपाच्या कोट्यातून प्रत्येकी २० जागा देण्याची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, आमदार अपूर्व हिरे, सुहास फरांदे, गिरीश पालवे, सुनील केदार, डॉ. प्रशांत भदाणे, प्रशांत जाधव, अजित ताडगे, नाना शिलेदार, विजय साने, दामोदर मानकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)