सचिन सांगळे, नांदूरशिंगोटेसिन्नर तालुक्यातील चास खिंड येथील भागोजी नाईक स्मृतिस्थळ दुर्लक्षित झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या ठिकाणाचा पर्यटनस्थळात समावेश केला आहे; मात्र त्याच्या विकासासाठी अद्यापपर्यंत निधी मंजूर न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या नाईक व त्यांच्या कुटुंबीयांच्या चास खिंडीतील स्मृतिस्थळाचा विकास करण्याची मागणी होत आहे. क्रांतिवीर भागोजी नाईक यांनी कोणतीही सत्ता किंवा आर्थिक पाठबळ नसताना ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा दिला होता. भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा याबद्दल त्याला खेद वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिन्नर, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास यादरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात करून त्यांना मार्गदर्शन केले. भागोजीने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. चास खिंडीत जेम्स विल्यम हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४ आॅक्टोबर १८५१ रोजी ब्रिटिश अधिकारी हेन्री मारला गेला. त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकांच्या मागावर होते. सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ नोव्हेंबर १८५९ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८ क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले. नांदूरशिंगोटे येथे सुरू झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.काही स्वातंत्र्यप्रेमींनी येथील चास खिंडीत भागोजी नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्मृतिस्थळाची उभारणी केली. या स्मृतिस्थळाजवळच भागोजी नाईक यांनी मारलेल्या ब्रिटिश अधिकारी हेन्री याचे स्मारक आहे. सदर स्मृतिस्थळाला मुंबई, पुणे, नाशिक, नगर येथील पुरातत्व खात्याच्या व इतिहास संशोधन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेटीही दिल्या आहेत. भागोजी नाईक यांचे जन्मस्थळ असलेल्या नांदूरशिंगोटे येथे भागोजी नाईक व त्यांच्या कुटुंबीयांंचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा अनेक वर्षांपासून व्यक्त्त होत आहे. दरवर्षी भागोजी नाईक यांच्या स्मृतिदिनी स्मृतिस्थळाच्या उपेक्षेबद्दल चिंता व्यक्त्त केली जाते. मात्र याची गांभीर्याने दखल शासन, लोकप्रतिनिधी केव्हा घेणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी भागोजी नाईक यांची १५६ वी पुण्यतिथी येथील ग्रामस्थ व क्रांतिवीर भागोजी नाईक सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.
निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
नांदूरशिंगोटेचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे जन्मस्थान विकास व कुलस्वामिनी श्री रेणुकामाता मंदिर यांचा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत (पर्यटन विकास) समावेश झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करुन त्वरित प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भागोजी नाईक यांच्या स्मृतिस्थळाच्या विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
भाऊ, मुलगा यांनाही वीरगती२0 डिसेंबर १८५१ रोजी पेठ जवळच्या वासिरहिरा येथे भागोजी व ब्रिटिश सैन्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात भागोजी नाईक यांचा भाऊ महिपती मारला गेला. ५ जुलै १९८९ रोजी संगमनेर तालुक्यातील आंभोराच्या डोंगरात झालेल्या युद्धात भागोजी यांचा तरुण मुलगा यशवंता गतप्राण झाला. अवघ्या साडेसतरा महिन्यांच्या कालावधीत भाऊ महिपती व मुलगा यशवंता गमावल्याचे भागोजी यांना दु:ख झाले. भागोजीची बहीण बायजानेसुद्धा इंग्रजी राजवटीविरुद्ध गुप्त माहिती देऊन मदत केली असून, तीसुद्धा लढाईतच मारली गेल्याचे इतिहासात असल्याचे सांगितले जाते.