नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत मिळविलेल्या यशामुळे भारतीय जनता पार्टी - शिवसेना युती विधानसभेतील यशाबाबत कमालीची आशादायी आहे. आघाडीच्या समीकरणांमध्ये येथील जागा कॉँग्रेसच्या वाट्यास असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काहींनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. गुडघ्याला बांधलेल्या बाशिंगाचे बळ आपल्यालाच लाभेल, अशी आशा साऱ्याच इच्छुकांना आहे...आगामी विधानसभा निवडणुकीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ ताब्यात घेण्यात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या सदर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा युतीने राजकीय चमत्कार घडविला आणि या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले. सलग दोन वेळा युतीच्या नवख्या उमेदवारास विधानसभेचा सोपान चढण्याची संधी या मतदारसंघाने दिली. त्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे या मतदारसंघाला त्र्यंबकेश्वर तालुका जोडला गेला आणि मग कॉँग्रेसने पुन्हा या मतदारसंघावर ताबा मिळविला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत मिळविलेल्या यशामुळे भारतीय जनता पार्टी - शिवसेना युती विधानसभेतील यशाबाबत कमालीची आशादायी आहे. अर्थात युतीच्या संसारात येथील जागा शिवसेनेच्या वाट्यास असली तरी अलीकडच्या काही घडामोडी पाहता या दोहोंची काडीमोड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर दोन्हीकडील इच्छुकांनी गुडघ्यास बाशिंग बांधले आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कॉँग्रेसकडे असल्यामुळे साहजिकच याच पक्षाचे वर्चस्व आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने राष्ट्रवादी कॉँग्रेस- कॉँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ यांना पाठबळ दिलेले असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. आघाडीच्या समीकरणांमध्ये येथील जागा कॉँग्रेसच्या वाट्यास असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काहींनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आशाही बळावल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक खूपच प्रतिष्ठेची होणार असल्याचे चित्र सदर मतदारसंघात पहावयास मिळत आहे. मोदी लाटेवर भरवसा...नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ उसळलेली लाट विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा भारतीय जनता पार्टीचा दावा असून, त्यामुळे साहजिकच भाजपेयींच्या आशा उंचावल्या आहेत. महायुतीचा प्रमुख घटक असलेल्या या पक्षाने प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी काम केले. मात्र कोणत्याही निवडणुकीत या पक्षाला उमेदवारी करण्याची संधी मिळाली नाही. सध्याच्या स्थितीत महायुतीला पूरक वातावरण दिसत असल्याने भाजपाच्या गोटातही अपेक्षा उंचावल्या आहेत. या मतदारसंघात विधानसभेची जागा भाजपाला मिळावी अशी मागणी केली जात आहे. तसे झाल्यास वा युतीचा संसार मोडल्यास भाजपा स्वबळावर रिंगणात उतरण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार पांडुरंग गांगड यांना भाजपा आमंत्रित करण्याची शक्यता आहे. तिकडे शिवसेनेकडून उमेदवारी नाकारली गेल्यास माजी आमदार शिवराम झोले यांनाही ऐनवळी भाजपा रिंगणात उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारीचा पेच सोडविण्याची कसरतयाआधी सलग दहा वर्ष इगतपुरी मतदारसंघावर वर्चस्व मिळविणाऱ्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे उमेदवारीवरून या पक्षात पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आघाडीच्या समीकरणात सदर मतदारसंघ कॉँग्रेसच्या वाट्यास असल्यामुळे उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे अपक्ष रिंगणात उतरण्याऐवजी कोणत्या का होईना पक्षाचा झेंडा हाती असावा म्हणून माजी आमदार शिवराम झोले यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता झोले, सरकारी नोकरदार उपआयुक्त चंद्रकांत खाडे यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचे माजी सभापती कावजी ठाकरे व संदीप जाधव यांनाही शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्याची आशा आहे. सध्या तरी शिवसेनेकडून खाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असून, तसे झाल्यास झोले यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खरे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चांगले वर्चस्व असूनही आघाडीच्या संसारात येथील जागा कॉँग्रेसच्या वाट्यास आहे. पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांचे या मतदारसंघावर चांगले प्रभुत्वही असून, आघाडीने सदर जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी, अशी आग्रही भूमिका पुन्हा एकदा मांडण्यात आली आहे. तसे झाल्यास वा राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्वबळावर रिंगणात उतरायचे ठरविल्यास उमेदवारीचा लंबक त्र्यंबक तालुक्याकडे झुकण्याची शक्यता आहे. आघाडीकडून रिंगणात उतरणे अशक्य आहे असे वाटल्यामुळचे माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आता त्यांना स्वगृही परत येणे तितके सोपे नाही. या पार्श्वभूमीवर गत निवडणुकीत शिवसेनेकडून नशीब अजमाविणारे रामदास घारे यांना राष्ट्रवादीकडून निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असून, दुसरीकडे हिरामण खोसकर, मधुकर लांडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. कॉँग्रेस आशावादी !विधानसभेत इगतपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉँग्रेसने गत पाच वर्षात येथे बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला असून, त्यामुळेच आघाडीच्या समीकरणात या मतदारसंघावरील कॉँग्रेसचा दावा अधिक बळकट राहणार आहे. कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार निर्मला गावित यांनाच पुन्हा रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी गावित या मतदारसंघास नवा चेहरा म्हणूनच सामोऱ्या आल्या होत्या. कोणतीही मोठी सभा झालेली नसताना केवळ परिवर्तनासाठी येथील मतदारांनी कॉँग्रेसला संधी दिली होती. आदिवासी राखीव असलेल्या या मतदारसंघातील उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदाही कॉँग्रेसला झाला होता. यावेळीही गत समीकरणांची पुनरावृत्ती होईल, अशी कॉँग्रेसची आशा आहे. या मतदारसंघात एकाच उमेदवारास सलग दोनवेळा विधानसभेचा सोपान चढता येत नसल्याचा इतिहास असून, तो लक्षात घेता कॉँग्रेसकडून ऐनवेळी नवा पत्ता उघड केला जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
बाशिंगबळाची साऱ्यांनाच आशा!
By admin | Updated: July 7, 2014 00:07 IST