नाशिक : कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन करायचे असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन हवे. यापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी मी २००० मध्येच तयारी सुरू केली होती. साहजिकच कुंभमेळा प्रत्यक्ष सुरू होण्याच्या आत कामे पूर्ण झाली. त्यामुळेच गेल्या कुंभमेळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या. आता मात्र एकूणच तयारीला विलंब झाल्याचे दिसत आहे, असे मत बारा वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याची तयारी करणारे महापालिकेचे माजी आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी व्यक्त केले.२००३-०४ या कालावधीत नाशिकमध्ये कुंभमेळा संपन्न झाला. त्यावेळी कृष्णकांत भोगे यांनी नियोजन केले होते. १ मे २००० रोजी महापालिकेची सूत्रे स्वीकारणाऱ्या भोगे यांनी कुंभमेळ्याची तयारी केली आणि त्यानंतर ११ एप्रिल २००३ मध्ये बदली झाली आणि त्यानंतर विमलेंद्र शरण यांनी सूत्रे स्वीकारली होती. गेल्या कुंभमेळ्यात अडचणी उद्भवल्या नसल्याचे साधू-महंत सांगतात. तथापि, गेल्यावेळी कुंभमेळ्याची वेळेत झालेली कामे आणि त्यासाठी निधीची उपलब्धता यामुळेच कुंभमेळा यशस्वी झाल्याचे भोगे सांगतात.कुंभमेळा म्हटला की तीन ते चार महत्त्वाचे टप्पे आहेत. कुंभमेळ्यासाठी साधू-महंत येतात. त्यापेक्षा कैकपटीने अधिक भाविक येतात. त्यामुळे या भाविकांसाठी रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा देणे, त्यानंतर साधू-महंतांच्या तीन महिने कालावधीसाठी साधुग्राम तयार करणे, तसेच त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन आणि महत्त्वाचे गोदावरी पात्राचे नियोजन करणे ही कामे असतात. मी नाशिकची सूत्रे स्वीकारली तेव्हा कुंभमेळा तीन वर्षांनी होणार होता. तथापि, अगोदरच तयारी सुरू केली होती. कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम असो अथवा बांधकाम, ही कामे करण्यासाठी किमान एक वर्ष कालावधी लागतो आणि त्याच कामांसाठी निविदा काढायचे म्हटले तर किमान सहा महिने इतका कालावधी प्रक्रिया राबविण्यासाठी लागतो. कित्येकदा फेरनिविदा मागवाव्या लागतात. त्याचा विचार केला तर पूर्वतयारीच आवश्यक असते. कुंभमेळ्याची तयारी करताना मी वेळापत्रकच आखून घेतले होते. त्यामुळे कोणतेही काम करताना अडचण आली नाही. सगळी कामे वेळेत पूर्ण करता आली. अगदी साधुग्रामसाठी जागा वेळेत घेतल्याने त्याठिकाणी येणाऱ्या साधूंना भूखंड देण्यापासून सर्व नियोजन करता आल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वतयारीवरच कुंभमेळ्याचे यश अवलंबून
By admin | Updated: July 31, 2014 00:53 IST