नाशिक : महाविद्यालय सोडून तशी चाळीस वर्षेे लोटली. परंतु जिवाचे मैत्र शांत बसू देईनात. मित्रांच्या ओढीने सर्वांची एकदा भेट झाली आणि मग दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वजण भेटू लागली. पुन्हा मैत्री फुलली. वयानुरूप सामाजिक जाणीव वाढली आणि आता सामाजिक कार्यदेखील होऊ लागले. पुनर्मैत्रीचे बंध जुळण्याचा तिसरा वर्धापनदिन सोहळा नाशिकरोडच्या लेस्ली सोनी सेंटरमध्ये साजरा झाला आणि १९७४ मधील बीवायकेतील माजी विद्यार्थ्यांनी आठवणी जागवल्या.१९७४ मध्ये महाविद्यालयात असलेली आता, तर ही सर्व ज्येष्ठ मंडळीच आहेत, परंतु प्रपंचातून आणि संसारातून थोडी उसंत मिळू लागली आणि पुन्हा एकदा कॉलेजमधील सुखद दिवस, मित्र, मैत्रिणी आठवायला लागले. यातूनच कॉलेजमधील मित्रांना एकत्र आणण्यासाठी संकल्पना श्रीपाद गलगले यांनी मांडली आणि त्याला इतर मित्रांनी होकार भरल्यानंतर जुन्या मित्रांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा पार पडला. यावेळी स्वानंद बेदरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर भगूर येथील सावरकर स्मारकास भेट देण्यात आली. माजी सहायक पोलीस आयुक्त मंडलेश्वर काळे, राजेंद्र ब्रह्मेचा, उल्हास जोगळेकर, गुरुमेलसिंग फनफेर, सोमनाथ जाजू, अनिल सुकणेकर आदींसह अन्य मान्यवर यावेळी सहभागी झाले होते.
ज्येष्ठांच्या पुनर्मैत्रीचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:36 IST