नाशिक : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भोजन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी शासनाकडे मुबलक प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. नाशिकचा अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्यात यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.आदिवासी विकास विभाग व टाटा ट्रस्ट तसेच अक्षयपात्र फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील अन्नपूर्णा या मध्यवर्ती स्वंयपाकगृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.४) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा होते. तसेच यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन,खा. हरिश्चंद्र चव्हाण,जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदारनिर्मला गावित,आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा,विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले,आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर, टाटा ट्रस्टचे व्यंकटरामन, अक्षयपात्र संस्थेचे आर.मदन, माजी आमदार शिवराम झोले आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात राजगोपाल देवरा यांनी सांगितले की, राज्यात टाटा ट्रस्टच्या गुंतवणुकीतून आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून मुंढेगाव व कांबळवाडी (पालघर) या दोन ठिकाणी ही मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची संकल्पना राबविण्यात येत आहे. व्यंकटरामन यांनी सांगितले की, देशातील आठ राज्यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून (पान ९ वर)असे उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सर्वाधिक निधी आदिवासी विकास विभागामार्फत खर्च होतो; मात्र आजही आदिवासी भागातील वसतिगृह व आश्रमशाळांची अवस्था दयनीय आहे. त्यात अशा प्रकारच्या सुविधांमुळे आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास मदत होईल. इथले जेवण इतके दर्जेदार आहे की, मुंबईहून येता जाता मी येथे जेवण करीत राहील,असे मिश्कीलपणे ते म्हणाले. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा प्रकारचे प्रकल्प गडचिरोली अमरावतीसह संपूर्ण राज्यात राबविणे गरजेचे आहे. निधीचा अजिबात तुटवडा नाही. निधी पडून आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये तिरंदाजी हा क्रीडा प्रकार लोकप्रिय असून त्यासाठीही सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन क्रीडा विषयक सुविधा पुरविल्यास येत्या आॅलिम्पिकमध्ये भारताला नक्की सुवर्णपदक मिळेल. यावेळी अपर आयुक्त अशोक लोखंडे, बाजीराव जाधव,जि.प.सदस्य गोरख बोडके,अॅड.संदीप गुळवे,अलका जाधव,नितीन वानखेडे,काशिनाथ मेंगाळ,कैलास चौधरी, भाऊसाहेब धोंगडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अन्नपूर्णा प्रकल्प राज्यभर राबविण्यात यावा
By admin | Updated: September 5, 2015 00:20 IST