येवला : आगामी सणासुदीच्या दिवसांत कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र शासनाने पाकिस्तान व अफगाणस्तिान येथून कांदा आयात करण्याचे धोरणामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव २०० रुपये प्रती क्विंटल पुकारायला सुरुवात करताच येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले व येवला-मनमाड रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन सुमारे अर्धा तास स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको केला. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे नेहमीप्रमाणे लिलाव सुरु झाले. बाजार आवारात २५० ट्रक्टर कांद्याची आवक होती.व्यापाऱ्यांनी कांदा लिलावाची बोली २०० रु पयांपासून बोलायला सुरुवात करताच शेतकरी संतप्त झाले व कांदा लिलाव बंद पडले आणि शेतकरी घोषणाबाजी करीत बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ आले. येवला -मनमाड रस्त्यावरील वाहतूक अडवली व अर्धा तास रास्ता रोको केला. दरम्यान, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, बाजार समिती सभापती शिवाजी वडाळकर, सचिव डी. सी. खैरनार, शेतकरी नेते संतू पाटील झांबरे, कांदा व्यापारी नंदू अट्टल, उमेश अट्टल, प्रदीप गुजराथी, हुसेन शेख सुभाष समदडिया, मनोज समदडिया यांनी मध्यस्थी करीत व आचारसंहितेचे कारण देत आता आंदोलनाचा काहीही उपयोग होणार नाही. आपण बाजार समितीच्या सभागृहात जाऊन चर्चा करू, अशी विनंती आंदोलकांना केली आणि आंदोलन थांबले. सारे कांदा उत्पादक आंदोलक शेतकरी बाजार समिती सभागृहात परतले. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या.
.कांद्याचे भाव कोसळल्याने येवल्यात आंदोलन
By admin | Updated: September 29, 2014 22:21 IST