नांदगाव : दोन दिवस शिंंगांनी ढुशा मारून व आडवे पाडून शहरवासीयांना पळताभुई थोडी करणार्या गायीचा अखेर मृत्यू झाला. तिला रेबीज झाल्याचे डॉ. कोहोक यांनी केलेले निदान खरे ठरले. गायीने जखमी केलेले नागरिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रेबीजग्रस्त पिसाळलेले कुत्रे चावलेल्या व्यक्तीवर वेळेत उपचार झाले नाहीत तर जिवाला धोका होतो. तोच प्रकार या गायीबाबत झाला. दरम्यान, गायीचा मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी जतपुरानजीक निर्मनुष्य जागी वनविभागात उघड्यावर टाकून देण्यात आला आहे. शहरात पालिकेतर्फे मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक बाबासाहेब घुगे यांनी दिली आहे. बाजार समितीमध्ये लिलावादरम्यान सांडलेला भाजीपाला व धान्य, कांदे खाण्यासाठी आलेली जनावरे तिथून आपला मोर्चा गावाकडे वळवितात. ही सगळी जनावरे सायंकाळी आपल्या खुट्यावर (मालकाकडे) जातात. अरुंद रस्त्यांवरून योणार्या-जाणार्या दुचाकी वाहनांचे यामुळे नेहमी अपघात होत असतात. पालिकेने रस्त्यावर फिरणार्या गायी, बैल, शेळ्या आदि जनावरांवर कारवाई करण्याचे फलक लावल्यानंतर आज तरी रस्ते जनावरांविना सुने होते. गेली कित्येक वर्षे रस्त्यावरील जनावरांकडे दुर्लक्ष करणार्या पालिकेने यापुढे ही सगळी जनावरे पकडून पांजरापोळमध्ये पाठविण्याचे ठरविले आहे. पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीमदेखील राबवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पळताभुई थोडी करणारी गाय अखेर मृत्युमुखी
By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST