पेठ -तालुक्यातील धानपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या नागरिकांना तब्बल ६० वर्षानंतर नळाचे पाणी पाहण्याचा योग आला असून वर्षानुवर्ष पायपीट करून डोक्यावर पाणी वाहणाऱ्या महिलांची यामुळे सुटका झाली आहे. दमणगंगा नदीच्या काठावर वसलेले धानपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव बोरपाडा व बिलकस अशी दोन लहान पाडे. अनेक वर्षापासून येथील नागरिक एक ते दीड किलोमीटर खोल नदीतून डोक्यावर पाणी आणत होते. मध्यंतरी ग्रामपंचायतीने एक कुपनलिका काढून दिली. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा भासत असे. ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश दरोडे, माजी सरपंच निवृत्ती गालट यांनी शासनाच्या विविध उपयोजना व पेसा योजनेचा सुव्यविस्थत वापर करून गावाला नळाद्वारे पाणीपूरवठा योजना यशस्वी केली. सदर योजनेचे लोकार्पण नुकतेच जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते झाले. याप्रसंगी उपसभापती तुळशिराम वाघमारे, मनोज घोंगे, विलास अलबाड, कुमार मोंढे, शामराव गावीत, मोहन कामडी, नंदू गवळी, सुरेश पवार, संतोष डोमे, पुंडलिक महाले, रामदास वाघेरे, विक्र म चौधरी, सरपंच रमेश दरोडे, निवृत्ती गालट,नवसू बोरसे, पोपट दरोडे, सोनू गालट, भगवान दरोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भूसावरे, शाखा अभियंता उशीर, ग्रामसेवक एम.ए. दळवी यांचेसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
धानपाडावासियांना मिळाले ६० वर्षानंतर नळाला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 14:54 IST