योगेश सगर कसबे सुकेणेजिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम देऊ शकणाऱ्या कसबे सुकेणे ते ओझर या बंद रेल्वेमार्गाचा वणी-सापुताऱ्यापर्यंत विस्तार करून ओझर कार्गो विमानतळासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने जिल्ह्यातील कोणत्याही खासदाराने व रेल्वेने प्रकल्पात लक्ष न घातल्याने अधिग्रहित जमिनीवर आता अतिक्र मण होऊ पाहत आहे. नाशिकच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या एचएएल प्रकल्पाची सोनेरी भेट नाशिकमधून संसदेत बिनविरोध गेलेले दिवंगत खासदार यशवंतराव चव्हाण यांनी दिली होती. या प्रकल्पासाठी सरकारने मध्य रेल्वेच्या कसबे सुकेणे ते ओझर रेल्वेमार्ग तयार करून काही वर्षे एचएएल कारखान्याच्या साधनसामग्रीची मालवाहतूक केली होती. काही वर्षांपासून हा रेल्वेमार्ग रेल्वेने बंद केला, तेव्हापासून शेकडो हेक्टर अधिग्रहित रेल्वेमार्गाची जमीन वापराविना पडून आहे. जर वापरच होत नसेल तर आमच्या जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत करा, ही मागणी आता होत आहे. परंतु दुसरी बाजू पाहिली तर विकासाचा दृष्टिकोन ठेवून खासदारांनी हा प्रकल्प पुनजीर्वित करणे वा सदर अधिग्रहित जमीन पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या भागातील स्थानिक उदासीनता आणि दुर्दैवाने खासदारांनीच दुर्लक्ष केल्याने बंद पडलेला रेल्वेमार्ग अतिक्र मणाला बळी पडत आहे. सिन्नर सेझमधील गुळवंच येथील इंडिया बुल्स प्रकल्प केवळ रेल्वेमार्गाअभावी रेंगाळलेला आहे. जमीन अधिग्रहणालाही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. अशी परिस्थिती सध्या रेल्वेमार्ग भूसंपादनाची असताना, सुकेणे-ओझर रेल्वेमार्गाची जमीन ताब्यात असूनही या भागाचा करंटेपणा म्हणा की दुर्दैव या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी एकाही पुढाऱ्याने पुढाकार घेतलेला नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या रेल्वेमार्गाचे सुकेणे-ओझरहून वणी-सापुताऱ्यापर्यंत विस्तार करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिग्रहित जमिनीला अतिक्रमणाची धास्ती
By admin | Updated: February 17, 2016 23:14 IST