कळवण : नाशिक जिल्हा मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रि या सुरू झाली असून, कळवण तालुका संचालकपदासाठी तब्बल आठ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे. कामाची मर्यादा कमी झाली असली तरी मजूर संस्था निवडणुकीचे महत्त्व कमी झाले नसल्याने लाखमोलाच्या या निवडणुकीत कळवण तालुक्यातील प्रमुख नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याने नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.ठेकेदारी व्यवसायात नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने या संस्थेचे सभासद असलेल्या सभासदांना शासन निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय कामांचे वाटप होते. कामाची मर्यादा कमी झाल्याने निवडणुकीला फारसे महत्त्व राहणार नाही अशी वदंता असताना कळवण तालुका संचालकपदासाठी तब्बल आठ इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली असून, तालुक्यातून महिला राखीव गटात दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यात फक्त ४५ मतदार असल्याने ही निवडणूक उमेदवारांसाठी नव्हे, तर नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.नाशिक जिल्हा मजूर संघाची मागील निवडणूक माजी मंत्री ए. टी. पवार, शकुंतला पवार आणि जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांच्याभोवती फिरली होती. त्यावेळी शब्दाखातर निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हा दिलेल्या शब्दाला उमेदवारांनी जागावे याची आठवणदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित बैठकीत एका उमेदवाराने करून दिली असून, नितीन पवार, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, रवींद्र देवरे, कौतिक पगार, धनंजय पवार, रमेश शिरसाठ या प्रमुख नेत्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणारी आहे. बिनविरोध निवड करायची की निवडणूक होऊ द्यायची हेदेखील नेतेमंडळींच्या हातात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. अंतिम टप्प्यात मजूर संघाच्या विद्यमान उपाध्यक्ष संगीता देवरे, माजी अध्यक्ष शरद गुंजाळ, ज्येष्ठ नेते हरिभाऊ वाघ, अजय पगार हे निवडणुकीतील प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मागील निवडणुकीचा इतिहास बघितला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली, निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या गेल्या. गटातटाच्या आणि शह-काटशहाच्या राजकारणामुळे कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. तालुक्यातील निवडणुका आणि राजकारण हा चर्चेचा विषय झाला होता. मजूर संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एका युवा नेत्याचा राजकीय उदय कळवण तालुक्यातून झाला असून, हा युवा नेता जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आणि जिल्हा बँकेवर संचालक आहे.रुसवे-फुगवे, नाराजी काढून निवडणूक लढविणारे उमेदवार व समर्थक मतदार यांची नितीन पवार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, नारायण हिरे, कौतिक पगार, रमेश शिरसाठ यांच्या उपस्थितीत कळवण शहरात दोन वेळा सयुक्तिक बैठका पार पडल्या. शिवाय योगायोग, विश्रामगृह या वैयक्तिक बैठकांनी तर जोर धरला आहे. अजूनही त्या चालू आहेत. पहिल्या बैठकीत यश न आल्याने दुसऱ्या बैठकीत नेतेमंडळीला आशेचा किरण दिसला. दोन बैठकांमधून बिनविरोध निवडीबाबत चर्चादेखील झाली. उमेदवारांचे मत नेतेमंडळींनी जाणून घेतले. त्यांनाच उमेदवार देण्याचा अधिकार देण्यात आला. बिनविरोध निवडीसाठी उमेदवारांनी थांबण्याची देखील मानसिकता दाखवली. त्यामुळे आता अंतिम टप्प्यात प्रमुख नेतेमंडळी काय भूमिका घेतात याकडेच लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
कळवण तालुक्यातून आठ अर्ज
By admin | Updated: February 17, 2016 23:02 IST