नांदगाव : संभाव्य नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या उद्देशातून हिंगणघाटचे भाजपा आमदार समीर पुनवेवार यांनी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील सत्य स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने प्रशासनातील उणिवा समोर आल्या. तसेच काही समस्यांवर निर्णय झाले. यासंदर्भातली माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी मटिंडा दयानिधी यांच्या दालनात त्यांनी संवाद साधला. गिरणा धरणावर असलेली नांदगाव शहर व ५६ खेडी योजना कार्यÞÞक्षम करण्यासाठी दोन वीज पंप खरेदी करण्याच्या प्रस्तावास आमदार पुनवेवार यांनी मान्यता दिल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या सुमारे एक लाख ९० हजार लोकसंख्येला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या योजनेवर अवलंबून असलेल्या जनतेस १८ ते २५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. नवीन पंप मिळाले तर हा कालावधी काही दिवसांनी कमी होणार आहे.यासंदर्भात नांदगाव नगरपालिकेने त्यांची वितरण व्यवस्था सुधारल्यास आवर्तन कालावधी अधिक कमी होऊन नागरिकांना आठ ते दहा दिवसात आवर्तन मिळावे असा मुद्दा मांडण्यात आला. वितरणासाठी निधी हवा असल्यास पालिकेकडून प्रस्ताव आला तर तो मुख्यमंत्री यांचेकडून मंजूर करून देण्याची हमी आमदार महोदयांनी दिली. १८ गावांकडून चाऱ्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकडे आले की, शासनाकडे मागणी करु असे एका प्रश्नाचे उत्तर देताना मटिंडा यांनी सांगितले.३१ मेपर्यंत शेतकऱ्यांचे ८० टक्के कर्जवाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच शासन शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करत असून, तशी हमी शासनाने घेतली आहे. कर्जवाटप साखळीतील तलाठी, ग्रामसेवक, सोसायटी, निबंधक, बँक या सर्वांना पुनवेवार यांनी सक्त सूचना देऊन कोणत्याही परिस्थितीत वेळापत्रकानुसार काम झाले पाहिजे असे बजावले. जलयुक्त शिवार योजनेत प्राधान्याने गाळ काढण्याचे, संजय गांधी निराधार योजना, रेशन दुकानातले धान्य उशिराने मिळते ते प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत मिळावे, अशा सूचना देण्यात आल्या.गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन त्या बंद असल्या तर दुरुस्ती झाली पाहिजे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश ही दिले. पण अंमलबजावणी झाली नाही. ती कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार पुनवेवार यांनी बैठकीत दिल्याची माहिती परिषदेत देण्यात आली. मी नवीन काही देण्यास आलो नाही. ज्या योजना आहेत. त्यांची अंमलबजावणी होते की नाही. जनतेचे काय म्हणणे आहे. ते ऐकून मदत करण्यासाठी आलो आहे असे ते म्हणाले. तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज ़छाजेड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. जयश्री दोंड, बळीराम निकम, सजन कवडे, भाऊसाहेब मगर, पुरुषोत्तम पगारे, मच्छिंद्र उगले, उमेश उगले, चंदाताई पाटणी, भगवान सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
५६ खेडी योजनेचे होणार पुनरुज्जीवन
By admin | Updated: May 8, 2016 23:05 IST