मंजूर : हेमंत गोेडसेनाशिक : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत संसरी ग्रामपंचायतीसाठी २००७-०८ मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन पूर्ण झाली. मात्र वितरण व्यवस्थेअभावी प्रलंबित असलेल्या या योजनेसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सन-२००७-०८ मध्ये ‘भारत निर्माण योजनेअंतर्गत’ संसरी गावासाठी नळपाणी पुरवठा योजनेसाठी खास बाब म्हणून मंजूर करून उद्भव विहीर, जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ यांची उभारणी झाली आहे. त्यासाठी ७२ लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. गावासाठी पूर्वी असलेली पाणी वितरण व्यवस्था निकामी झाल्याने व नवीन व्यवस्थेसाठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. ही बाबत खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे संपूर्ण संसरी गावासह मळे विभागातील आठ ते नऊ किलोमीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करताना ४९ लाख ६३ हजार ७७४ रुपये खर्चाच्या निधीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. संसरी गावाची सहा हजारांवर लोकसंख्या असून, गावकऱ्यांना मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी त्यामुळे उपलब्ध होणार आहे. शासनाच्या सन-२०१४-१५ या राष्ट्रीय पेयजल कृती आराखड्यात या योजनेचा समावेश झाल्याने गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
संसरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लाख
By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST