घोटी : धरण व पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात नियोजन व अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे १४ कोटी रुपये खर्चानंतरही ३७ योजना ठप्प असल्याची माहिती इगतपुरीत झालेल्या आढावा बैठकीत उघड झाली. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात सापडला असताना दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे न राबविल्याने तसेच या योजनांच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज इगतपुरीच्या तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार निर्मला गावित यांनी तालुक्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची स्थिती जाणून घेतली. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून शासनाने तालुक्यातील ३७ योजनांसाठी साडेतेरा कोटी रुपये देऊनही एकही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्याची तक्रार उपस्थित नागरिकांनी बैठकीत मांडल्यानंतर बैठकीस उपस्थित आर. टी. चित्ते यांनी या योजना कार्यान्वित झाल्याची माहिती दिली. त्यात तथ्य नसल्याने उपस्थितांनी त्यांना धारेवर धरले. १९ गावांची टँकरची मागणी असताना पंचायत समितीने केवळ चारच गावांना टँकर उपलब्ध करून दिल्याने इतर गावे पाण्यासाठी तडफडत असल्याची कैफियत ग्रामस्थांनी मांडल्यानंतर गावे टँकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बैठकीत तहसीलदार महेंद्र पवार, अजय सूर्यवंशी, जनार्दन माळी, किरण कोवे, सभापती ठकूबाई सावंत पांडुरंग शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात ३७ योजना ठप्प
By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST