पंचवटी : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे पंचवटी परिसरात तब्बल २५ हून अधिक वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. कोसळलेले वृक्ष हटविण्याचे काम पंचवटी अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात आले. वृक्षांपाठोपाठ शेकडो वृक्षांच्या फांदा पावसामुळे कोसळल्या त्या फांदा हटविण्याचे काम स्थानिक नागरीक तसेच महापालिकेच्या ठेकेदारांनी केले. मंगळवारी व बुधवारी दुपारच्या सुमाराला पंचवटीसह संपुर्ण शहरात पावसाने दमदारपणे हजेरी लावली होती. वादळी वारा व गारपीठमुळे पंचवटीतील मेरी, म्हसरूळ, आडगाव, नांदूर मानूर, हिरावाडी, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, हिरावाडीरोड, पंचवटी कारंजा, हनुमानवाडी, तळेनगर आदिंसह परिसरातील रस्त्यालगत असलेले वड, आंबा, चिंच, गुलमोहर, अशोक आदिंसह विविध जातीचे वृक्ष कोसळले होते. वृक्ष कोसळल्याची माहीती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्त्याच्या मधोमध पडलेल्या वृक्षांच्या फांदा तत्काळ बाजू करून रस्ता मोकळा करून दिला तर धोकेदायक वृक्षांच्या फांदा उतरवून घेतल्या. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही मात्र ज्याठिकाणी वृक्षाखाली वाहने सापडली गेली त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. कोसळलेल्या वृक्षात काही जुनाट वृक्षांचा समावेश असल्याचे पंचवटी अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)
पावसामुळे पंचवटीत कोसळले २५ वृक्ष
By admin | Updated: May 30, 2014 01:07 IST