लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : संपूर्ण कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आठव्या दिवशी मिटल्याने शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार पालेभाज्यांनी भरला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत बाजार समितीत जवळपास २३२८ क्ंिवटल इतक्या शेतमालाची आवक आली होती. सायंकाळीही पालेभाज्यांचे लिलाव सुरळीत झाले.विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून (दि. १) संप पुकारल्याने बाजार समितीतील दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. सलग आठवडाभर संप सुरूच असल्याने संपूर्ण शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झालेली होती. भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना तिप्पट दराने भाजीपाला खरेदी करावा लागला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बाजार समितीतील सर्वच घटकांवर परिणाम झाला होता. गुरुवारी सुकाणू कमिटीची बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केल्याने भल्या पहाटेपासूनच वर्दळ सुरू होती. बाजार समितीत फ्लॉवर, टमाटे, काकडी, भोपळा, गिलके, दोडके, वांगी, ढोबळी मिरची असा शेतमाल सकाळी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला होता. दुपारपर्यंत जवळपास साडेतीन हजार क्ंिवटल शेतमालाची आवक आली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिली. बाजार समितीत दुपारी फळभाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शेतकरी संपावर जाण्यापूर्वी जो बाजारभाव होता तसाच बाजारभाव शुक्रवारी झालेल्या लिलावात शेतकऱ्यांना मिळाला. ढोबळी मिरची २२० रुपये (१० किलो), कारले ३५० रुपये (१२ किलो), वांगे ४०० रुपये (१५ किलो), भोपळा २५० रुपये (१८ नग) असा बाजारभाव फळभाज्यांना मिळाला.
२३२८ क्ंिवटल आवक, लिलाव सुरळीत सुरू
By admin | Updated: June 10, 2017 02:00 IST