नाशिक : इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल या महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून माध्यमिक विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. शहरातील सुमारे ४६ महाविद्यालयांमध्ये १९,७२० इतकी प्रवेश क्षमता असल्याने प्रवेशापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्राचार्यांच्या सहविचार सभेत प्रवेशाचे नियोजन केले जाणार आहे.अकरावी प्रवेशाचे नियोजन करण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने येत्या १३ रोजी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत शहर तसेच जिल्ह्यातील इयत्ता अकरावी प्रवेशाचे नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या आणि अकरावीत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता तफावत दिसत असली, तरी प्रत्यक्षात अकरावीचे विद्यार्थी पॉलिटेक्निक, आयटीआय तसेच इतर अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याने अकरावी प्रवेशाची कोणतीही अडचण होणार नाही, असा दावा माध्यमिक विभागाने केला आहे. शहरातील ४६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १९,७२० इतकी प्रवेश क्षमता असून, त्यामध्ये ४६४० कला शाखा, ७२८० विज्ञान शाखा, ७३२० वाणिज्य शाखा आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाच्या ४८० जागा आहेत. यंदा अनेक नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्यामुळे अकरावीची प्रवेश क्षमता वाढलेली आहे. यंदादेखील प्रवेशप्रक्रिया कशी राबविली जाईल याविषयीची उत्सुकता असून, केटीएचएम महाविद्यालयात मात्र यंदापासून संपूर्ण प्रक्रिया ही आॅनलाइन राबविली जाण्याची शक्यता आहे. इतर महाविद्यालयांमध्ये नेहमीप्रमाणे केवळ संगणकावर अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरच प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. (प्रतिनिधी)
शहरात अकरावीच्या १९ हजार जागा
By admin | Updated: June 7, 2014 01:36 IST