मनोज शेलार
जिल्हा परिषद निवडणूक होणार की नाही हा प्रश्न अजूनही अधांतरी असला तरी किमान निवडणुकीच्या या सर्व प्रक्रियेमुळे मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यात अर्थात कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यात नेत्यांना यश आले. यामुळे किमान पक्ष बांधणी, संघटन आणि काम याला चारही प्रमुख पक्षांमध्ये गती मिळण्यास मदत झाली आहे. शिवाय कुंपणावर असलेल्या काहींनी थेट पक्ष बदल करून आपली पोळी भाजून घेण्याचाही प्रयत्न केलाच. आता निवडणुका झाल्याच तर पुढील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि तीन पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आहे. अर्ज दाखल करण्यास आता माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच राज्य शासन आणि विविध राजकीय पक्षांनी या निवडणुका स्थगित कराव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही स्पष्ट झालेला आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे आता लक्ष लागून आहे. असे असले तरी चारही प्रमुख पक्षांनी मात्र निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. मागील जागा टिकविण्यासह त्यात आणखी वाढ करण्यासाठी भाजप, काँग्रेस व शिवसेना प्रयत्नशील आहे, तर राष्ट्रवादी किमान एक जागा तरी पदरात पाडून घेता यावी यासाठी मेहनत करीत आहे. भाजप विरोधी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी आपापल्या सोयीच्या गटांमध्ये उमेदवार दिलेले आहेत.
दुसरीकडे काही राजकीय घडामोडी होऊन कुंपणावर असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ऐनवेळी पक्ष बदल करून उमेदवारी पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा व सध्या विभागीय पातळीवर पद असलेल्या हेमलता शितोळे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवीत म्हसावदसारख्या गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शितोळे या भाजपकडून शहादा तालुक्यातील एखाद्या गटात उमेदवारी करतील अशी शक्यता वर्तविली जात असताना त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांनी मात्र भाजपकडे कल दाखवीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून शनिमांडळ गटातून उमेदवारी केली होती. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते; परंतु ते पद त्यांना न मिळाल्याने ते पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळे आधीपासूनच आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर निष्ठा असल्याने त्यांनी भाजपला प्राधान्य देत पक्ष प्रवेश केला आणि आपल्या पत्नीला शनिमांडळ गटातून भाजपची उमेदवारी मिळवून घेतली. दुसरीकडे नेत्यांच्या मुलांनीदेखील यावेळी उमेदवारी दाखल केली आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आणि माजी जि.प. उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी आपल्या कोपर्ली गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात मात्र विरोधकांना दमदार उमेदवार देता आलेला नाही. आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित यांनी कोळदा व खापर गटातून अर्ज दाखल केला असला तरी त्या कोळदा गटातूनच उमेदवारी करणार आहेत. विधानसभा निवडणूक लढविलेले दोन नेतेही जि.प.च्या आखाड्यात उतरले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या आमशा पाडवी व भाजपचे पदाधिकारी नागेश पाडवी यांनी खापर गटातून एकमेकांना शह देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी जि.प. उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी त्यांच्या पत्नींना कहाटूळ गटात भाजपतर्फे रिंगणात उतरविले आहे. माजी सभापती जयश्री दीपक पाटील या लोणखेडा गटातून राहतील. माजी सभापती अभिजित पाटील यांनी मात्र निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले आहे.
एकूणच जिल्हा परिषद निवडणूक होते किंवा तिला स्थगिती मिळते याबाबत उत्सुकता असली तरी गेल्या दीड वर्षापासून एकही निवडणूक नसल्याने सुस्तावलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांना मोलाची मदत करणाऱ्या ठरल्या आहेत.