कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर शासनाकडून वेळोवेळी संचारबंदी, लॉकडाऊन यासारखे पर्याय अवलंबले गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मनाई आदेश जारी केले असून, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे.
विसरवाडी पोलीस ठाण्यातील हद्दीतील पोलीस पाटील व यात्रेचे आयोजक व संयोजक यांची बैठक घेण्यात आलेली असून, त्यांना यात्रा रद्द करण्याबाबत बैठकीत कळविण्यात आले आहे. तसेच यात्रा दरम्यान होणाऱ्या सोंगाड्या पार्टी, भंडारा या कार्यक्रमांनादेखील परवानगी नाकारण्यात आलेली आहे.
विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत महाशिवरात्री निमित्ताने घोगळपाडा, वडदा, बर्डीपाडा, भरडू, दापूर या ठिकाणी यात्रांचे आयोजन होत असते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता शासनाकडून यात्रांवर बंदी घालण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व गावातील यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील दिली आहे.