गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनदरम्यान वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसाठी राज्य शासनाने वेळोवेळो वीज तोडणीसंदर्भात आदेश निर्गमित केले होते. त्यामुळे वीज ग्राहकही संभ्रमात होते. पुन्हा अधिवेशन संपताच वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन खंडित करायला सुरुवात केल्याने ग्राहकांमध्ये रोष दिसून येत आहे. वीज कंपनीकडून ग्राहकांना ऑनलाइन थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात असले तरी मोबाइल सर्वच ग्राहकांकडे नसल्यामुळे व नेटवर्कअभावी अनेकवेळा ग्राहकांपर्यंत तो मेसेज पोहोचत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांना कळण्यास विलंब होत असल्याने वेळीच बिले भरले जात नाहीत. अशातच वीज वितरण कंपनीकडून होत असलेल्या धडक कारवाईने ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नवापूर तालुका शाखेतर्फे येथे कामानिमित्त आलेल्या कार्यकारी अभियंता एस.एम. पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनदरम्यान लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता काहीसे पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असून जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. अशातच व्यावसायिकांना वीज बिले भरताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने वीज जोडणी खंडित करण्यापूर्वी वीज ग्राहकांना आठ दिवस आधी लेखी स्वरूपात नोटीस देऊन कळविण्याची विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष लालसिंग गावीत, सचिव लाजरस गावीत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश येवले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.