लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील उंटावद ते मलोणी दरम्यान गोमाई नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या अंतीम टप्प्यातील कामाकडे प्रशासनासह ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले असल्याने लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पुलाच्या अंतीम टप्प्यातील काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहादा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील उंटावद ते मलोणीकडे जाणाºया मार्गावरील गोमाई नदीवर हा पूल उभारण्यात आला असून, या पुलाच्या अंतिम टप्प्यातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा आधार घेत संबंधित ठेकेदार काम पूर्ण करीत नसल्याची चर्चा आहे. अंतीम टप्प्यातील हे काम एका महिन्यात पूर्ण होणार होते मात्र या डबक्यामुळे ते चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून ठेकेदारास काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे डोळे असून, आंधळ्याचे सोंग करीत असल्याचा आरोप केला जात आहे.येत्या चार महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम झाले नाही तर पुन्हा एक वर्ष या पुलाच्या बांधकामासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देवून संबंधित ठेकेदार व अधिकाºयांना या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.ठेकेदारास दोंडाईचा येथे नवीन काम मिळाले असल्याने तो या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. हा ठेकेदार नवीन कामामुळे जुन्या कामाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करून संबंधित पुलाचे काम येत्या महिनाभरातच पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे
उंटावद ते मलोणी पुलाचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:16 IST