मोड येथील शेतकरी पुरुषोत्तम रामदास चव्हाण यांनी त्यांच्या शेतात सहा एकर क्षेत्रात सिजेन्टा शुगर क्वीन नामक कंपनीचे बियाणे लागवड केली होती. उन्हाळ्यात टरबूज उत्पादन घेत आर्थिक उन्नती करून घेण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न होता. परंतु कंपनीने मार्गदर्शन न केल्याने हे बियाणे वाया जाऊन शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाकडे बियाणे उत्पादक कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार केली असून कृषी विभागाच्या पथकाने मोड शिवारातील शेतात जाऊन याची माहिती घेतली होती. दरम्यान तालुक्यातील हा पहिलाच प्रकार नसल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी तसेच चालू हंगामातही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असेच प्रकार घडले असून कृषी विभागाच्या पथकाने टरबूज उत्पादक लागवड करत असलेल्या बियाण्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या पथकांनी तालुक्यात भेटी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आहे.
विभागीय कृषी विस्तार अधिकारी एस.बी. देसले, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, पंचायत समितीचे इ.बी. कदम, मंडळ कृषी अधिकारी आर.आर. मंचरे, कृषीपर्यवेक्षक बी.एस. पाटील, ज्योती गावीत तसेच बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीचे भाऊसाहेब गोसावी व बियाणे विक्रेता विश्वास पाटील यांनी याठिकाणी भेट देत पाहणी केली.
बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना बियाण्याची लागवड कोणत्या ऋतूत करावी याची कोणतीही माहिती न दिली गेल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
तळाेदा तालुक्यात गेल्या काही वर्षात टरबूज उत्पादनाकडे बागायतदार शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी किमान ५०० हेक्टरपर्यंत टरबुजाची लागवड केली जाते. ९० दिवसांच्या या पिकाची लागवड केल्यानंतर शेतकरी त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करतात.
मोड येथील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांनी टरबूज लागवड केल्यानंतर वेलीवर आलेल्या फळाचा आकार वाढत नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी वेळावेळी फवारणी करण्यासह खत देऊनही आकार न वाढता वेली सुकून गेल्याचे दिसून आले होते. या प्रकारानंतर त्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने येथे भेट दिली.
n तळोदा तालुक्यात चालू हंगामात एकूण ५९ हेक्टर टरबूज लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यात वाढ होणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी मध्यानंतर टरबूज लागवडीचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.