उन्हाच्या तडाख्यामुळे वन्यप्राणी, पशू-पक्ष्यांचा जीव कासावीस होत असून, अन्न-पाण्याच्या शोधात ते मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. ब्राह्मणपुरी परिसरात वानरांनी अन्नपाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तळ ठोकला आहे. घराच्या अंगणात, गच्चीवर, ओट्यावर, मिळेल त्या ठिकाणी या वानरांनी आपले बस्तान बसविले असून, त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शहादा शहरासह गाववस्तीत मोठ्या प्रमाणावर वानरांची संख्या दिसून येते. जंगलतोड, पाणी आणि अन्नाचा अभाव यामुळे परिसरातील वाड्या-वस्त्या आणि गावांमध्येही मोठ्या संख्येने वानरांचा कळप दाखल झाला आहे. पण सध्या प्रचंड उन्हामुळे पाणी आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी ही वानरे गावात दाखल झाली आहेत. घराच्या अंगणात, ओट्यावर, झाडावर आणि घराच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणावर वानरे दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतो आहे त्यामुळे वन्यप्राणी, अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. वानरांची संख्या लक्षात घेऊन वनविभागाने त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लॉकडाऊनमुळे अन्न मिळेना : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर पडत नसल्याने वानरांना अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यानाही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.