गुरांचा बाजार बंद
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनामुळे गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून हे बाजार बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे भरणारे बाजार सुरू करण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.
उकाड्याचा त्रास
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज दुपारी कडक ऊन पडत आहे. यामुळे उकाडा वाढला आहे. या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रात्री डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
कर्ज वाटपास टाळाटाळ
नंदुरबार : सध्या खरीप पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. परंतु काही बँकांकडून कर्ज वाटपास विलंब होत आहे. शेतकरी मात्र कर्जासाठी बँकेत हेलपाटे मारताना दिसत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
केबलचे काम सुरू
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात नवापूर चौफुली पासून नवीन वीज वाहिनीसाठी खांब उभे करण्यात आले आहेत. या खांबांवर विजेच्या तारा ऐवजी केबल लावण्यात आल्याने वीजपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.