प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पुलावर येण्याआधी दोघं बाजूंनी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातसदृश स्थिती निर्माण होत असून, अनेकदा वाहनदेखील नादुरुस्त होत आहेत.
याबाबत असे की, नंदुरबार व प्रकाशाला जोडणाऱ्या तापी नदी पुलावर दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेकदा वाहन नादुरुस्त होत असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. या पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप आहेत. मात्र, त्यात वाळू व इतर कचरा भरला असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावरच पाण्याचे डबके साचत आहे.
हा रस्ता ज्यांच्याकडे हस्तांतरित झालेला आहे त्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार घडत असल्याचं वाहनधारकांकडून बोलले जात आहे. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच साफसफाई होणे अपेक्षित होते.
परंतु याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा सर्व प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन येथील रस्त्यावरील डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.याच रस्त्यावरून अधिकारी, पदाधिकारी, मंत्री आदी ये-जा करतात तेव्हा त्यांनी तरी दखल घ्यावी व संबंधित ठेकेदाराला पुलाच्या दुरुस्तीसह पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.