लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्या व लोकांनी काळजी घ्यावी यासाठी ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार मंगळवारपासून बंद ठेवले जाणार आहेत. आता ग्रामिण भागातीलही सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार असून आश्रमशाळा, होस्टेलमधील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात येत आहे. खाजगी व शासकीय रुग्णालयांमधील सर्व आयसीयू वॉर्ड, व्हेंटीलेटर देखील आरक्षीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, जिल्ह्यात एकही रुग्ण नाही त्यामुळे जनतेने घाबरून जावू नये. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.कोरोना संदर्भातील उपाययोजना, घेतलेले निर्णय आणि नागरिकांना आवाहनासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आठ जण संशयीत होते. त्यापैकी दोन जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सहा जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, होस्टेल, खाजगी क्लासेस यांना देखील ३१ मार्चपर्यंत सुट्टया देण्यात आल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा या वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत. जे या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलमान्वये गुन्हा दाखल करणार आहे.९३ आयसीयू वॉर्ड आरक्षीतजिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांमधील आयसीयू वॉर्ड आरक्षीत करण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयातील ३९ आणि खाजगी रुग्णालयातील ५४ असे एकुण ९३ आयसीयूमधील बेड आरक्षीत राहणार आहेत. याशिवाय शासकीय रुग्णालयातील पाच आणि खाजगी रुग्णालयातील १४ असे एकुण १९ व्हेंटीलेटर देखील आरक्षीत ठेवण्यात आले आहेत. तशा सुचना संबधीत सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.आठवडेबाजार, यात्रा स्थगितजिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या त्या नगरपालिका, नगरपंचायती आणि तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे. आठवडे बाजार बंद राहील इतर व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे जनतेने किंवा व्यापाऱ्यांनी कुठल्याही वस्तूंचा साठा करू नये, वस्तूंचा साठा करणाºया व्यापाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी यात्रोत्सव असेल, सार्वजनिक धार्मिक समारंभ असतील अशा ठिकाणचे कार्यक्रम देखील रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवाजी सुकरे, अतिरक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.अत्यावश्यक तक्रार, अडचणीचे निवेदन असेल तर ८८८८१३७९६७ या व्हॉट्सअप नंबरवर निवेदनाची प्रत पाठविता येणार आहे. वैयक्तिक व किरकोळ तक्रारी नको. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवरही निवेदन, तक्रार पाठविता येणार आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असेल तरच कार्यालयांमध्ये यावे तशा सुचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.४३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, सामाजिक सभागृहे बंद ठेवली जाणार आहेत. या ठिकाणी लग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ होणार नाही याच्या सुचना देण्यात येत आहेत. लग्न समारंभाला मंगल कार्यालये दिल्यास संबधीत मालकाकडून दंड आकारला जाणार आहे.४घरी असलेल्या विवाह समारंभांमध्ये मोजकेच आणि जवळचेच लोकं येतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शक्यतो संशयीत रुग्ण आढळलेल्या शहरातून येणाºया पाहुण्यांना जास्त आग्रह करू नये. लग्न समारंभ एक जिव्हाळ्याची आणि जिवनातील आनंदाची बाब असली तरी अशा वेळी सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही निर्णय घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी स्पष्ट केले.४लग्न समारंभ आयोजित केले गेले असतील तर येणाºया पाहुण्यांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जावी. हस्तांदोलने टाळावी, खोकतांना, शिंकतांना रुमाल वापरावा, हात स्वच्छ धुण्यासाठी उपाय योजना कराव्या. कमीत कमी वेळेत समारंभ संपेल यासाठी प्रयत्न करावा.बाजारात मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे बोगस मास्क विक्री होण्याची शक्यता आहे. शिवाय एमआरपीपेक्षा अधीक दराने विक्री केल्यास अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशीच कारवाई सॅनिटायझर विक्री करणाºयांवरही होणार आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहे.जिल्ह्यात मास्क लावून फिरण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे मास्कची मागणी करू नये. लोकांनी घाबरून जावू नये. केवळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी. शिंकतांना, खोकतांना काळजी घ्यावी, वारंवार हात धुवावे, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणे टाळावे, प्रवास टाळावा.असेही स्पष्ट करण्यात आले.जिल्हा रुग्णालयात हेल्प लाईन नंबर कार्यान्वीत राहणार आहे. (०२५६४- २१०१३५) हा क्रमांक २४ तास उपलब्ध राहणार आहे. येथे शंका निरसन करता येणार आहे. जिल्हा रुग्णालयात एन-९५ मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. निगराणी कक्ष आणि इतर आवश्यक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आठवडे बाजार व सर्व शाळाही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:01 IST