नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेची खरेदी, नवीन वास्तूत प्रवेश, नवीन वास्तू खरेदी यासह इतर अनेक बाबींवर कोरोनाने पाणी फेरले आहे. याशिवाय योगायोगाने याच दिवशी आलेल्या रमजान ईदच्या खरेदीलाही कोरोनाने ब्रेक बसविला आहे. यामुळे कोट्यवधींची उलाढाल जिल्ह्यात ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती होती. त्यामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. अक्षय तृतीयेला तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ किंवा वास्तू प्रवेश, वास्तू खरेदी केली जाते. सोने खरेदीलादेखील या दिवशी महत्त्व असते. परंतु कोरोना व संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे व्यवहार ठप्प झाले. अनेकांना आपले नियोजन पुढे ढकलावे लागले आहे. या सर्वांमध्ये व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती.
रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घर, प्लॅाट खरेदी न झाल्याने रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. नोटबंदीपासून हे क्षेत्र जेमतेम जम बसविण्याचा प्रयत्न करीत असतांना गेल्या वर्षापासून कोरोना आणि लॅाकडाऊनने पुन्हा या क्षेत्राची रुळावर आलेली गाडी रुळावरून खाली उतरली आहे. दिवाळीपासून थोडेफार व्यवहार सुरू झाले असतांना पुन्हा मार्चपासून कोरोनाच्या कहरने थैमान घालून व्यवहार ठप्प झाले. गेल्या अडीच महिन्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची नोंद उपनिबंधक कार्यालयात झाली आहे.
सराफा बाजारात शुकशुकाट
सराफा बाजारात देखील १ एप्रिलपासून शुकशुकाट आहे. ऐन लग्न सराई आणि गुढीपाडवा व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देखील बाजारात उलाढाल होऊ शकली नाही. गेल्या वर्षी देखील तब्बल दोन महिने सराफा बाजार बंद होता. त्यानंतर आता पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. आता थेट जून महिन्यात सराफा बाजार उघडणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे दोन महिन्यातील कोट्यवधींची उलाढाल यंदाही ठप्प झाली आहे. सराफा व्यावसायिकांना सकाळच्या सत्रात दुकाने उघडी ठेवण्याची मागणी करण्यात येत असली तरी त्या मागणीकडे लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र आहे.
अक्षय तृतीयेच्या आनंदावर विरजण
अक्षय तृतीयेचा आनंद व उत्साहावर यंदा विरजण पडले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या नातेवाइकांचे निधन झाले आहे. अनेकजण कोरोनातून बाहेर आले तरी आर्थिक व मानसिक खच्चीकरणामुळे ते अजूनही त्यातून सावरलेेले नाही. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेवर विरजण पडल्याचे चित्र आहे.
ईदचा उत्साहही कमी
यंदा ईदचा उत्साह देखील कमी झाला आहे. कोरोना काळातच रमजानचे रोजे आले. शुक्रवारी ईद साजरा होत असली तरी ती सार्वजनिकरित्या साजरी करण्यात अडचणी येणार असल्याने उत्साह पार मावळला आहे.
मुस्लीम समाजात रमजान ईदचे मोठे महत्त्व असते. संपूर्ण परिवार व नातेवाइक एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत व शीरखुर्माची दावत देत हा सण साजरा करतात. त्यासाठी घरांची सजावट, नवीन कपडे, वस्तू खरेदी केले जातात. त्यासाठी महिनाभरापासूनच त्याची तयारी केली जाते, खरेदी केली जाते. यंदा मात्र महिनाभरापासून लॅाकडाऊन असल्यामुळे खरेदीवर विरजण पडलेच. शिवाय ईद साजरी करण्यावरही मर्यादा आल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम धर्मगुरूंनीच तसेच विविध धार्मिक संघटनांनी ईद साजरी करतांना प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.