ग्रामरक्षक दलात सरपंच, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी,पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कोतवाल, मुख्याध्यापक, मोठ्या गावात मुख्यालय तलाठी यांचा समावेश करावा. आवश्यकता भासल्यास गावातील माजी सैनिक, एनसीसी कॅडेट, गावातील पोलीस रेकॉर्ड चांगले असलेले व निरोगी तरुण यांचा गरजेनुसार समावेश करावा. सदस्यांनी आळीपाळीने प्रत्येकी आठ तासांचे नियोजन करावे. ग्रामसेवकांनी दलातील सदस्यांना ओळखपत्र द्यावे. ग्रामरक्षक दलाने ४५ वर्षांवरील दीर्घ आजाराच्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करणे, सीमा भागातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे तापमान मोजणे, जिल्ह्यात प्रवेशाचे सबळ पुरावे पहाणे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कोरोना बाधित व्यक्तींचे विलगीकरण करणे, गृह विलगीकरणातील व्यक्तीवर लक्ष ठेवणे, गावातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची बाहेरील क्षेत्रात ये जा होणार नाही याकडे लक्ष देणे आदी जबाबदारी पार पाडावी.
सदर अंमलबजावणी कोणताही बळाचा वापर न करता सामंजस्याने करावी. वादविवाद, भांडण, अथवा कायदा व सुव्यवस्थेची समस्या उद्भवल्यास पोलीस स्टेशन प्रभारी यांना तत्काळ माहिती द्यावी व पोलिसांनी नंतरची कार्यवाही करावी. ग्रामरक्षक दल पोलीस मित्र म्हणून कार्यरत राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.