सावळदा फाटा ते वरुळ कानडी हे चार किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. दुचाकी वाहने चालवतानाही मोठी कसरत करावी लागते. चारचाकी वाहने चालवतानाही मोठ्या प्रमाणात वाद होतात. एक वाहन दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करू शकत नाही. त्यात वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. या रस्त्याने गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. डांबर, खडी, कच या वजनदार बांधकाम साहित्याची वाहतूक डम्परने सतत सुरू राहते. ज्या गौण खनिजांनी रस्ते निर्माण होतात त्याच खनिजांची वाहतूक येथे सुरू असते तरीही खड्ड्यांची डागडुजी होत नाही, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक कानाकोपऱ्यात पक्के रस्ते तयार झाले आहेत. परंतु या रस्त्याचे भाग्य अजून उजळत नाही, याबाबतही शंका निर्माण केली जात आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व त्यातूनच अपघात होतात. सतत वादाच्या घटना याठिकाणी घडतात. संबंधित रस्ते विभागाने किमान या रस्त्याची डागडुजी तरी करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.
वरुळ-कानडी रस्ता दुरवस्थेने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST