नंदुरबार : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील लसीकरण केंद्रात लस उपलब्ध असताना केवळ कर्मचारी संख्या कमी असल्याने नोंदणी केलेल्या अनेक नागरिकांना परत जावे लागले. यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळदेखील निर्माण झाला होता. दरम्यान, लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील अनेक लसीकरण केंद्र लस अभावी बंद पडले होते. शुक्रवारी काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू झाले. नाट्यगृहातील केंद्रात २०० लसीचे डोस उपलब्ध होत्या. दिवसभरात ९४ डोस झाले. परंतु या ठिकाणी कर्मचारी संख्या कमी होती. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना दुपारी तीन ते पाच वाजेचा स्लॅाट देण्यात आला होता. परंतु पाच वाजेपर्यंत त्यातील अनेकांचे लसीकरणच होऊ शकले नाही. कर्मचारी संख्या कमी आणि पाच वाजेची वेळ मर्यादा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले. त्यामुळे दीड, दोन तास रांगेत उभे राहूनही लस न मिळाल्याने काहींनी संताप व्यक्त केला. यावेळी काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला होता. शुक्रवारी या केंद्रात कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी येथे उपस्थित नागरिकांनी केली.
दरम्यान, सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागल्याने गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. परिणामी किमान एक किंवा दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.