बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य जनता ही बँकिंग सेवेपासून वंचित होणार असून, देशातील गरीब व दुर्बल घटकांना ऋण मिळणे तसेच सरकारी योजनांचा लाभ घेणे कठीण होणार आहे. तसेच सामान्य नागरिकांच्या मेहनतीच्या कमाईची बँकांमध्ये ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे त्याची परतफेडीची हमी राहणार नाही. खासगी कारखानदार व उद्योगपतींच्या हातात बँकांचे व्यवस्थापन गेल्याने आज देशात खासगी बँकांची कशी परिस्थिती आहे हे सर्वज्ञात आहे. अनेक खासगी बँका बुडाल्या असताना त्या सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यात सरकारला यश मिळाले. जर बँका खाजगी झाल्या तर अशा परिस्थितीत ठेवीदारांच्या ठेवींचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटणार नाही. देशात बेरोजगाराची भीषण परिस्थिती असताना कामगार कपातीचे शस्त्र उपसले जाणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागणार असून, बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन, ती अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही.
परंतु आज आपल्या देशात सुरळीत असलेल्या बँकिंग उद्योगाला खासगीकरणाच्या माध्यमातून सुरूंग लावण्याचे प्रयत्न होत आहे. तेेव्हा सामान्य नागरिकांनी वेळीच भविष्यातील धोके लक्षात घेऊन सावध होणे गरजेचे असून, बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हात बळकट करावे, असे आवाहन करण्यात आले.