सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदी पुलावर दररोज वाहतूक ठप्प होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ही वाहतूक ठप्प होते. या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने हळूवार चालतात. या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त होणे, पंक्चर होणे, तोल जाऊन ऊस खाली पडणे अशा अनेक कारणांमुळे पुलावर नेहमी वाहतूक ठप्प होते. मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल गेल्याने सर्व ऊस खाली पडला आणि एक ते दीड तासापर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बॅरेजवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करुन वारंवार उद्भवणारी ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्यांमुळे डोकेदुखी
ऊस वाहतूक करताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावल्यामुळे मागील वाहन पुढे जाण्यास अडचण येते. तसेच जास्त ऊस भरल्यामुळे काही ट्रॅक्टर लोड घेत नाहीत. परिणामी अपघात होण्याची शक्यता असते. समोरील वाहनालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी ट्रॅक्टरमालकांना सूचना देऊन ही धोकेदायक ऊस वाहतूक बंद करण्याची गरज आहे. तसेच पोलीस प्रशासनाने प्रकाशा पुलावर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणीही होत आहे.