लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरू असली तरी प्रवासी नकार देत असल्याने ऐनवेळी तिकिटे रद्द होणे सुरूच आहे. यातून रेल्वेस्थानकातही शुकशुकाट आहे.
नंदुरबार रेल्वेस्थानकातून सप्ताहात साधारण ३९ प्रवासी गाड्या सध्या मार्गस्थ होत आहेत. यातील सहा गाड्या या दैनंदिन आहेत. या व्यतिरिक्त साप्ताहिक गाड्या धावत असल्याने जळगाव-उधना मार्गावरील नंदुरबार रेल्वेस्थानकात नियमित वर्दळ असते. परंतु लाॅकडाऊनमुळे ही वर्दळ कमी झाली असून नागरिक प्रवास करणे थांबवत असल्याने दर दिवशी तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. दक्षिण भारतासह नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुजरात राज्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र कायम असून गुजरातमधून येणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मेमो व पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने केवळ एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या सध्या उधना-जळगाव मार्गावर धावत आहेत. या गाड्यांमधून थेट मोठ्या शहरांमधून प्रवास करणे शक्य होत असल्याने छोट्या स्थानकांवरील प्रवाशांचा रेल्वे प्रवासही थांबला असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रोज रेल्वेतून प्रवाशांची संख्या
दररोज जाणाऱ्या रेल्वे
आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या
लांब पल्ल्याचा प्रवास थांबा
नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुखस्थानक असल्याने गुजरात राज्यातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. परंतु गेल्या एक महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देवदर्शनासह पर्यटनासाठी जाणाऱ्यांचा प्रवास थांबला आहे.
यामुळे हावडा-अहमदाबाद, नवजीवन, ताप्तीगंगा यासह इतर गाड्यांना सहज आरक्षण मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनापूर्वी लग्नसराईत तोबा गर्दी उसळणाऱ्या नंदुरबार रेल्वेस्थानकात सध्या शुकशुकाट आहे. रेल्वे आरक्षणाच्या चार्टमध्येही वाढ नसल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक म्हणून प्रवास करणारे १०० च्या जवळपास प्रवासी बुकिंग करत असल्याचे सांगण्यात आले.
रद्द करणे वाढले
तिकीट रद्द करण्यात स्थानिक प्रवाशांची मोठी संख्या आहे. कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही मजूर गावाकडे गेले होते. या मजुरांकडून गेल्या आठवडाभरापर्यंत बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इतर कामानिमित्त गेलेल्या १५० पेक्षा अधिक जणांनी गेल्या आठवड्यापासून बुकिंग रद्द केल्याची माहिती दिली गेली.
तिकीट विक्री झाली कमी
n दरम्यान, एकीकडे बुकिंग रद्द होत असताना तिकीट पॅसेंजर आणि मेमो गाड्या बंद असल्याने दैनंदिन तिकीट विक्रीवर परिणाम झाला आहे. दिवसभरात केवळ १० टक्केच जनरल सीटसाठीच्या तिकिटांची विक्री होत असल्याचा दावा नंदुरबार येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला आहे.