लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बेलीपाडा येथील तिघांवर चवताळलेल्या अस्वलाने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली़ शेतात अचानक अस्वल आल्याचे सांगण्यात आले आहे़ हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़मोहिदा येथे सोमवारी रात्री घडलेल्या घटनेपाठोपाठ बुधवारी सकाळी लागलीच घडलेल्या घटनेमुळे भितीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे़ बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाचे पथक येथे दाखल झाले होते़ त्यांनी घटनास्थळावर पंचनामा करत अस्वलाचा शोध सुरु केला आहे़ याठिकाणी अस्वलाच्या पायाचे ठसेही मिळून आले आहेत़बेलीपाडा येथील शेतकरी नारायण गणा वळवी हे शेतात बोअरमध्ये मोटार टाकत असताना अचानक त्यांच्या पाठीमागे येवून अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला़ यात त्यांच्या पाठीसह पृष्ठभागाचे लचके तोडून जखमी केले़ प्रसंगावधान राखत नारायण वळवी यांनी अस्वलाच्या तावडीतून सुटून पळ काढला़ याचवेळी समोरुन येणारा ११ वर्षीय मुलगा अनिल जयसिंग वसावे याच्याकडे अस्वलाने मोर्चा वळवला़ त्याच्यावर हल्ला चढवून पोट आणि हाताचा चावा घेत गंभीर जखमी केले़ बालकाच्या ओरडण्याने तेथून पळालेल्या अस्वलाने जवळच्या शेतात पीकांना पाणी देणाऱ्या अशोक चंदू तडवी यांच्यावरही हल्ला केला़ तडवी यांनी अस्वलाला प्रतिकार करुन त्यांच्या पायाला चावा घेत जखमी केले़ सकाळी साडेदहा वाजेपासून पाऊण तास हा थरार सुरु होता़ शेतातून जखमी अवस्थेत घराकडे गेलेल्या नारायण वळवी यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी शेतशिवारात धाव घेत अस्वलाला हुसकावून लावले होते़ तिघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून तिघांची प्रकृती सुधारत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे़घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल वासुदेव माळी, ए़सी़पाटील, वनरक्षक आऱजे़शिरसाठ, विरसिंग पावरा, अमित पाडवी यांनी बेलीपाडा गाठून माहिती घेतली़
पाहणी करणाऱ्या वनविभागाच्या पथकाला अस्वलाच्या पायाचे ठसे दिसून आल्यानंतर त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे़ हे अस्वल याच भागात फिरत असावे असा अंदाज असल्याने तीन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत़ परीसरातील गावाच्या सरपंचांना सूचना करुन गावांमध्ये एकट्यादुकट्याने कोणी फिरु नये याबाबत सूचित करण्यात आले आहे़खरीपपूर्व कामे सुरु असल्याने शेतकरी शेतशिवारातच त्यावेळी हा प्रकार घडला़ गावापासून शेत जवळ असल्याने तातडीने सर्व जण धावून आल्याने तिघांचा जीव वाचला आहे़ दरम्यान या भागात वनविभागाचे पथक गस्त करणार आहे़ अस्वलाने केलेल्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली असून यापूर्वी असा प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे़
अवघ्या दोन दिवसात अस्वलाने केलेल्या हल्ल्याचे गूढ वाढले आहे़ दोन्ही घटनांमध्ये अस्वलाला असुरक्षित वाटेल अशी कोणतीही कृती हल्ला झालेल्यांकडून करण्यात आलेली नाही़ बेलीपाड्यात शेतकरी नारायण वळवी हे मोटार टाकत असताना बेसावध होते़ त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला़ उर्वरित दोघेही बेसावध असताना अस्वलाने त्यांच्याकडे मोर्चा वळवला़ मोहिदे येथील शेतकरी ट्रॅक्टरवरुन खाली उतरल्यानंतर बांधावर उभे असताना अस्वलाने हल्ला केल्याने वन्यजीव अभ्यासकांची मदत घेऊन तपास करण्याची गरज आहे़