ग्रामीण भागात कांद्याचे गावरान बियाणे विक्री करण्यासाठी बोगस विक्रेते येत आहेत. तरी हे बियाणे कोणत्याही अधिकृत किंवा नोंदणीकृत व्यवसाय व उद्योगाचे विक्रेते नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे संबंधित सूत्रधाराचा छडा लावण्यास अवघड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोगस विक्रेत्यापासून सावध राहिले पाहिजे. जेणेकरून फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहेत.
शहादा तालुक्यात कारवाई
शहादा तालुक्यातील सांरगखेडा येथे कृषी विभागाने धाड टाकून नारायण गिरासे गावात छुप्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास बंदी असलेले एच.टी.बी.टी कापूस बियाणे विनापरवाना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात सांरगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालात एच.टी.बी.टी कापूस बियाण्याचे ५० पॅकेट सापडले असून ५८००० किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, एन. डी. पाडवी आदी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत दुकांनावरून बियाणे खरेदी करावे. बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर पथके नेमण्यात आली असून तपासणी पथकांना काही गैरप्रकार आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधीक्षक, नंदुरबार.