बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारुड म्हणाले, कोविड बाधितांना बेड्सच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष सुरू करावे. शहादा येथे १००, नवापूर आणि तळोदा येथे किमान ५० बेड्सच्या ऑक्सिजन बेड्सची सुविधा करावी. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन बेड्सची सुविधा निर्माण करण्यासाठी आवाहन करण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा कोविड सेंटरसाठी घ्यावी. तालुकास्तरावर व्हेंटीलेटरची सुविधा सुरू करण्यात यावी, त्यासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षण करावे.
धडगाव येथे ३० आणि शहादा येथे १०० बेड्सचे सीसीसी तयार ठेवावे. नवापूर आणि तळोदा येथे कोविड केअर सेंटर सुविधा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी. अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करावे. शहादा येथेही लवकरच ऑक्सिजन प्लँटची सुविधा होणार आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची एनआरएचएममधून नेमणूक करावी. ऑक्सिजन बेड आवश्यक नसलेल्या कोरोना बाधितांना गृह अलगीकरणात किंवा कोविड केअर सेंटरला स्थलांतरीत करावे व गरजूंना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावा.
नव्याने वाढणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी टीम वर्क म्हणून आवश्यक नियोजन करावे. खासगी रुग्णालयासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करावी आणि असे रुग्णालय कोविड हॉस्पिटल सुरू करणार असल्यास त्वरित मान्यता देण्याची कार्यवाही करावी. एका आठवड्यात आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी.
जिल्ह्यात एका आठवड्यात आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रतिबंधित क्षेत्रातील बाधित व्यक्तींच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी तत्काळ करण्यात यावी. ग्रामीण भागात अधिक संसर्ग आढळल्यास पूर्ण गावात मोहीम स्तरावर कोरोना चाचण्या करण्यात याव्यात. रॅपिड अँटिजेन चाचणीत कोरोना बाधित आढळणाऱ्यांना स्थानिक स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्यात यावी.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आणि शहरी भागात वॉर्डनिहाय कोरोना लसीकरणासाठी नियोजन करावे. गावात लसीकरणासाठी स्थळ निश्चित करावे. ग्रामस्थांना एक आठवड्यापूर्वी सूचना द्यावी आणि शिबिराच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे. कोरोना उपचारांसोबत लसीकरण मोहीमही वेगाने राबवावी. जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे आणखी २९ हजार डोस प्राप्त होत आहेत. ३० दिवसांच्या लसीकरण मोहीमेचे सूक्ष्म नियोजन करावे आणि लसीकरण शिबिराची माहिती नागरिकांना द्यावी.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील सीमांवर बारकाईने लक्ष द्यावे. कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आवश्यक असल्याचे नागरिकांना समजावून सांगावे. मोठे सोहळे टाळण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.