लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे जैवविविधता रजिस्टर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार नंदुरबार जिल्ह्यात कामकाज सुरु आहे़ ग्रामसेवक आणि ग्रामस्तरीय समिती यांच्यावर सोपवलेल्या या कामात विद्यार्थ्यांचेही सहाय्य होणार असून राज्य जैवविविधता मंडळाने या संबधी सर्व विद्यापीठांना आदेश दिले आहेत़जिल्ह्यात ५८६ ग्रामपंचायतींमध्ये रजिस्टर तयार करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे़ यांतर्गत जैवविविधता समित्यांची स्थापना करण्यात येऊन ग्रामसेवक ३१ प्रकारचे अर्ज भरुन गावातील जैवविविधतेची माहिती घेत आहेत़ येत्या ३१ जानेवारी २०२० पर्यंत हे रजिस्टर पूर्ण करावयाचे आहे़ तशी कारवाई न झाल्यास सहभागी असलेल्या सर्वच यंत्रणांना किमान १० लाख रुपयांचा दंड शासनाकडून केला जाऊ शकतो़ या नोंदींमुळे गाव शिवारातील पाणी, माती, वनस्पती, हवामान, सूक्ष्मजीव, प्राणी यांची अचूक व खरीखुरी माहिती समोर येणार आहे़ यामुळे दुर्मिळ होत जाणाऱ्या अनेक बाबींवर लक्षही केंद्रीत होऊन त्यांचे संवर्धन होणार आहे़ देशपातळीवर सुरु झालेल्या या उपक्रमाचा नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांना लाभ होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यातील सर्व गावे जैवविविधेतच्या बाबतीत परिपूर्ण असून येथील अनेक बाबी ह्या दुर्लक्षित आहेत़ रजिस्टरमध्ये नोंदणी केल्यानंतर या ‘वारसा’ला नष्ट करणे किंवा धोका पोहोचवू पाहणाऱ्यांना जैवविविधता व्यवस्थापन समित्या दंड करण्यास सक्षम होणार आहेत़
राज्यभर सुरु झालेल्या या उपक्रमात विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असणार आहे़ त्यादृष्टीने महाराष्ट्र जैवविधिता मंडळाने सर्व विद्यापीठांना जुलै २०१९ मध्ये पत्र देऊन ‘रावे’ उपक्रमांतर्गत सहा महिने गावांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जैवविविधता रजिस्टर तयार करण्याच्या कामात मदत करण्याचे आदेश दिले आहेत़ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गावांमध्ये ‘रावे’ अर्थात रुरल अॅग्रीकल्चर वर्क एक्सपिरियन्स कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक व समितीला मदत करावयाची आहे़ यात विद्यार्थ्यांसोबत जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी यासह विविध विषयात तज्ञ असलेल्या प्राध्यापकांनीही सहभाग देण्याचे सुचवण्यात आले आहे़