लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : जीवघेणा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत़कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये, असेही निर्देश जिल्ह्यातील शाळांना देण्यात आले आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सतर्क झाला आहे.प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन याबाबत सूचित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूची लागण देशातील तसेच महाराष्ट्रातील काही भागात झाली आहे. या विषाणूची लागण रोखण्यासाठी तसेच कमी करण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू असून या विषाणूचा प्रसार रोखणे किंवा कमी करण्यासाठी सर्वसामान्य जनता तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे अत्यावश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबाबत सर्व शाळांना सूचना देऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व जिल्हा परिषद शाळांना याबाबत सूचना करुन त्याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. रोकडे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले गेले आहेत़ दरम्यान शुक्रवारी नंदुरबार शहर व परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हातधुण्याचे प्रशिक्षण देण्याबाबत शाळांकडून पुढाकार घेण्यात येत होता़
विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:06 IST