नवापूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचे कोरोनाने गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता निधन झाले. पालिका प्रशासनाने कोरोना नियमानुसार अंत्यविधी न करता नातेवाइकांना कोरोना रुग्णाचे प्रेत देऊन अंत्यसंस्कार का? करू दिले. प्रेतावर शहरातील २० ते २५ हिंदू-मुस्लीम बांधवांनी माणुसकीच्या नात्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अंत्यविधी केला. यातून लोकांना कोरोनाची लागण झाली तर जबाबदारी नगरपालिका प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
नगरपालिकेच्या तीनटेंभा परिसरातील स्मशानभूमीत रात्री ११ वाजता टेम्पो घेऊन लाकडांची व्यवस्था करण्यासाठी गेले असता काही लोकांनी टेम्पोवर दगडफेक करून काचा फोडल्या. माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा संताप व्यक्त केला जात आहे. हा पहिला प्रकार नसून याआधीही महादेव गल्लीत एका प्रेतावर पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू न देता लहान चिंचपाडा परिसरात केला. त्याठिकाणीही काही लोक दु:खी कुटुंबाला मारहाण करण्यासाठी धावून आले होते. असे प्रकार वारंवार का घडतात, यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पालिकेचे लोकप्रतिनिधी याप्रकरणी गप्प का आहेत.
यासंदर्भात नगरसेवक विशाल सांगळे यांनी रात्रीच मुख्याधिकारी व तहसीलदार यांना फोन करून माहिती दिली. मुख्याधिकारी म्हणाले की, कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मरीमाता मंदिरासमोर जागा केली आहे. त्याठिकाणी अंत्यविधी करावा; परंतु त्याठिकाणी पालिकेने कुठलीही व्यवस्था केलेली नाही. लाइट नाही, लाकडांची व्यवस्था नाही, बिकट परिस्थितीत अंत्यसंस्कार रात्री दीड वाजता केले जात आहेत.
मरणानंतर मरणयातना... अशी अवस्था नवापूर शहरात दिसून येत आहे. मुक्तीचा प्रवास जेथून सुरू होतो तेथेच नरकयातना भोगाव्या लागतात. जगाचा निरोप घेणाऱ्यांच्या शरीरावर योग्यरीत्या अंत्यसंस्कार केले जावेत, ही प्रत्येकाची इच्छा असली तरी कोरोना आजाराने मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जगताप परिवाराचे सांत्वन न करता परिसरातील बहुतांश लोकांनी दारे खिडक्या बंद करून घेतली, असा आरोप त्यांच्या समाजातील लोकांनी सोशल मीडियावर केला; परंतु अपक्ष नगरसेवक विशाल सांगळे संध्याकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत आठ-दहा मित्रांबरोबर अंत्यविधीसाठी मदत करीत होते. परिवारातील तीन सदस्य उपस्थित होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन रंगावली नदीकिनारी मरीमाता मंदिराजवळ अंत्यविधी केला, असा खुलासा केला. व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रेताची अवहेलना होऊ नये, अंत्यसंस्कार करणे सुलभ व्हावे याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनात अंत्यविधीतून कोरोना प्रादुर्भाव होऊ नये याकडेही लक्ष द्यावे. नवापूर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामात आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी कुठे आहेत, दिसतच नाहीत. नवापूर शहरातील कोरोना परिस्थितीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
शनिवारी रात्रीचा प्रकार व शुक्रवारी करंजी ओवरा येथील सकाळचा प्रकार निंदनीय आहे. नवापूर येथील रहिवासी बडगुजर यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे अंतिम संस्कार काही तरुण सहकार्य करत असताना काही लोकांनी विरोध करून मंडळी मारीमता स्मशानभूमीत सकाळी आठ वाजता धिंगाणा घातला ही काय माणुसकी आहे का ?
-एजाज शेख, सरचिटणीस, भाजप, नवापूर
एखाद्याच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या वेळेस जर का कोणी अडथळा निर्माण करत असतील तर हे माणुसकीच्या विरोधात आहे. अंतिम संस्काराच्या वेळेस जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
-हसमुख पाटील, जिल्हा उपप्रमुख, नंदुरबार
पालिका शासकीय नियमांचे पालन का करीत नाही
कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना काढण्यात आली आहे. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट परिधान करून शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते; परंतु कोरोना आजाराने पालिकेच्या माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपालिकेची होती; परंतु नवापूर शहरातील काही २०-२५ नागरिकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची कोरोना तपासणी करून त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे होते. त्यांच्यापासून परिवारातील इतर सदस्यांना धोका निर्माण होऊ शकतो.